विशाळगड हिंसाचार: मी माफी मागितल्याचा विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न - शाहू छत्रपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:38 IST2024-07-19T13:38:04+5:302024-07-19T13:38:47+5:30
अतिक्रमित सरकार कधी काढणार?

विशाळगड हिंसाचार: मी माफी मागितल्याचा विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न - शाहू छत्रपती
कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही माफी मागण्यासाठी नव्हे तर मदत देण्यासाठी गेलो होतो, असे खासदार शाहू छत्रपती यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मी मुस्लीम समाजाची माफी मागितल्याचा गैरसमज करून दिला जात आहे. तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी अनेक महिला एकाच वेळी मोठ्याने बोलत होत्या. एक महिला तिच्या कानातीलही आंदोलकांनी हिसकावून नेले, असे कानाला हात लावून सांगत होती. परंतु, मला ते नीट ऐकू येत नव्हते. म्हणून मी त्यांना ॲक्शन करून मला ऐकू येत नाही, असे सांगत होतो, असे त्यांनी सांगितले.
मदत ढोंगीपणाची असल्याच्या आरोपाबाबत बोलताना, मदत ही मदत असते. ती कमी जास्त असू शकते. परंतु, ती आम्ही मनापासून केली आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षकांना हिंसाचार थांबविता आला असता, परंतु, त्यांनी काहीच केले नाही म्हणून सगळे घडले, अशी टीकाही शाहू छत्रपती यांनी केली.
जलील यांनी येऊ नये
एमआयएमचे इम्तियाज जलील कोल्हापुरात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी कोल्हापुरात येऊन आणखी वातावरण बिघडवू नये. घडलेल्या हिंसाचारास विरोध करण्यास कोल्हापूर सक्षम आहेत, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
मुश्रीफ यांच्यावर राग
हिंसाचार झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ विशाळगडावर गेले नाहीत याचा राग सभेत व्यक्त झाला. पालकमंत्र्यांना रस्त्यात अडवून त्याचा जाब विचारला पाहिजे, असे विजय देवणे म्हणाले.
अतिक्रमित सरकार कधी काढणार?
फडणवीस विशाळगडावरील अतिक्रमणावर बोलत आहेत. परंतु, आमचा त्यांना सवाल आहे की, महाराष्ट्रात जे अतिक्रमण करून सरकार स्थापन केले आहे ते कधी काढणार, अशी विचारणा बाबा इंदूलकर यांनी केली.