निरोगी जोडीदार आणि एकत्र कुटुंब हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:57+5:302021-09-02T04:53:57+5:30
कोल्हापूर : कोरोनानंतर उपवर वधू-वरांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. मुलगा आयटीतलाच हवा, मुलगी गोरीपानच हवी, सुंदर असावी, कमावणारी ...
कोल्हापूर : कोरोनानंतर उपवर वधू-वरांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. मुलगा आयटीतलाच हवा, मुलगी गोरीपानच हवी, सुंदर असावी, कमावणारी असावी, मुलाला लाखाचे पॅकेज हवे, सासू-सासऱ्यांचा त्रास नको, एकत्र कुटुंब नको, अशा अटी-शर्तींवर लग्न करण्याची मानसिकता आता राहिली नाही. एकत्र कुटुंब पद्धती, पैशांपेक्षा निरोगी आयुष्य याचे महत्त्व पटल्याने आता अपेक्षांमध्येही बदल झाला आहे.
दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या कोरोनाने माणसाच्या जगण्याच्या संकल्पनाच बदलल्या. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. कोरोनाचा शिरकाव झालेल्या कुटुंबांना एकटेपणात जगावे लागले. एखाद्याचा मृत्यू झाला तर खांदा द्यायलाही कोणी नसते, याची जाणीव झाली. निरोगी आणि आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व नव्याने कळले. या महामारीने पैशांपेक्षा नातेसंबंधांचे महत्त्व आणि गरजही कळले. सगळ्याच क्षेत्रावर या आजाराचे जसे चांगले वाईट परिणाम झाले तसेच परिणाम उपवर वधू-वरांच्या अपेक्षांवरही झाले.
एरवी मला अमूक पगारात, विशिष्ट शहरात राहणारा, आई-वडील जवळ राहत नसलेला नवरा हवा अशी अपेक्षा असलेल्या मुलींना आता निरोगी-कोणतेही आजार नसलेला, आरोग्यदायी जीवनशैली असलेला, जरा कमी पगाराचा आणि शक्यतो आपल्याच शहरात किंवा फार तर शेजारच्या जिल्ह्यात राहणारा नवरा हवा आहे. संकटकाळात नोकरी-व्यवसायात अडचणी आल्या तर सारवणारी माणसं असावीत म्हणून एकत्र कुटुंबही चालेल, असे मुलींचे व पालकांचेही म्हणणे आहे.
मुलांनाही मुलगी देखणी, गोरीपान, उच्चशिक्षित हवी, नोकरी करणारी हवा अशा वेगवेगळ्या अपेक्षा होत्या, आता त्यांनाही मुरड घालत कुटुंब व्यवस्था सांभाळणारी, एकत्र कुटुंबात राहणारी आणि जरा कमी शिकलेली किंवा कमी पगाराची नोकरी असलेली मुलगीही चालेल, अशी अपेक्षा आहे.
--
या अपेक्षांची पडली भर
-निरोगी, आरोग्यदाजी जीवनशैली
-ऑनलाईन क्षेत्रातील नोकरी
-आपल्याच शहरातील किंवा कमी अंतर असलेल्या जिल्ह्यातील स्थळ
-कमी पगार असला तरी चालेल, पण चांगला स्वभाव
-आई-वडील, एकत्र कुटुंब असले तरी चालेल
-मुलगीही कमावती हवी.
----
या अपेक्षा झाल्या कमी
- लग्न धुमधडाक्यात व्हावे
-अमूक शहरातच राहणारा मुलगा-मुलगी हवी
-गलेलठ्ठ पगार
-शाश्वत नोकरी किंवा व्यवसाय
-मुलगा एकुलता एक हवा
-आई-वडील जवळ नको
----
कोरोना, लॉकडाऊनने निरोगी आयुष्य, एकत्र कुटुंब आणि पैशांपेक्षा नात्यांना आणि सुखी जीवनाला अधिक महत्त्व असल्याची जाणीव झाली आहे. त्याचा परिणाम वधू-वरांच्या अपेक्षांवरही झाला आहे. डामडौल, दिखावा न करता कमी पैशात लग्न होतात हे कळलं. म्हणूनच या काळात विवाहांचे प्रमाणही वाढले.
-श्रीकांत लिमये, पंचरत्न वधू-वर सूचक केंद्र
---