‘शाहू’साठी मुश्रीफांचा पाठिंबा स्वागतार्ह
By admin | Published: July 25, 2016 11:56 PM2016-07-25T23:56:17+5:302016-07-26T00:19:35+5:30
संग्रामसिंह नलवडे : बिनविरोधचे आवाहन
गडहिंग्लज : शाहू साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना दिलेला बिनशर्त पाठिंबा स्वागतार्ह आहे. अन्य नेत्यांनीही त्यांच्या निर्णयाचे अनुकरण करावे आणि संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या ऋणातून कागलच्या जनतेने उतराई व्हावे, असे आवाहन गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी पत्रकातून केले आहे.
शाहू महाराजांच्या विचाराने विकासाची तळमळ घेऊन राजेंनी शेतकऱ्यांसाठी हयात घालविली. त्यांनी उभारलेला शाहू कारखाना सहकाराचा मानदंड आहे. सध्या साखर कारखान्यांची अवस्था दयनीय आहे. अशा परिस्थितीत काटेकोर नियोजन व काटकसर करून त्यांनी व त्यांच्या पश्चात समरजितसिंह यांनी शाहू कारखाना सुरळीत चालू ठेवला आहे. कागल तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार विक्रमसिंह घाटगे हेच आहेत. या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. जनता सुजाण आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
दोघांची तळमळ एकच
स्व. आप्पासाहेब नलवडे यांनी ११ महिन्यांत गडहिंग्लज साखर कारखाना उभा करून शिल्लकशासकीय भागभांडवल सरकारला परत केले. विक्रमसिंहराजे आणि त्यांचे विचार व तळमळ एकच होती. शेतकऱ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून दोघांनी वाटचाल केली, असेही नलवडे यांनी पत्रकात आवर्जून नमूद केले आहे.