जनगणनेचा अर्ज भरतांना ‘हिंदू धर्म’ असेच नमूद करा : लिंगायत महासंघाचे आवाहन; कोल्हापुरात उद्या होणार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:08+5:302021-02-06T04:42:08+5:30
कोल्हापूर : हिंदू हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पद्धती आहे, याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे येत्या ...
कोल्हापूर : हिंदू हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरण पद्धती आहे, याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे येत्या जनगणनेवेळी लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात हिंदू धर्म असेच नमूद करावे, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने केले आहे. महासंघाचा नववा वर्धापनदिन सोहळा येथे उद्या, शनिवारी अक्कमहादेवी मंटपात दुपारी १२ वाजता होत आहे. त्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी केले आहे.
डॉ. स्वामी म्हणतात की, वीरशैव समाज हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याला हिंदू धर्मापासून वेगळे करता येत नाही. समाजातील काही राजकीय मंडळी वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करीत आहेत. येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात स्वत:चा धर्म ‘लिंगायत’ असे लिहिण्यासाठी सांगून ते समाजाची मोठी दिशाभूल करीत आहेत. वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी पडून स्वत:च्या हिंदू धर्माला सोडू नये. जनगणनेचा अर्ज भरताना धर्माच्या रकान्यात ‘हिंदू धर्म’ असेच नमूद करावे.
वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे. यासह विविध क्षेत्रांत स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या वीरशैव समाजातील १० मान्यवरांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाचे यजमानपद अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या कोल्हापूर शाखेने स्वीकारले आहे.
मान्यवर उपस्थिती
परमपूज्य डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य गौडगांवकर (खासदार), परमपूज्य डॉ. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर, परमपूज्य डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधामकर, परमपूज्य श्रीगुरू महादेव शिवाचार्य वाईकर, वेदान्ताचार्य दिगंबर शिवाचार्य वसमतकर, परमपूज्य डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य वाईकर, नूल मठाचे मठाधिपती परमपूज्य गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य यांची वंदनीय उपस्थिती या वर्धापन दिनाला लाभणार असल्याची माहिती डॉ. विजय जंगम स्वामी यांनी दिली.
दोन मतप्रवाह
जनगणनेवेळी धर्माच्या रकान्यात काय नोंद करायची यावरून वीरशैव लिंगायत समाजात सध्या दोन प्रवाह तयार झाले आहेत. लिंगायत धर्म म्हणून स्वतंत्र मान्यता मिळावी यासाठी गेले काही महिने आंदोलन करणाऱ्या गटाचे म्हणणे आहे की, जनगणनेवेळी त्यांनी धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ म्हणूनच नोंद करावी. ही भूमिका मान्य नसलेल्या प्रवाहाचे म्हणणे असे की, आपण लिंगायत असलो तरी मूळ हिंदू धर्माचेच घटक आहोत. डाव्या आणि उजव्या सनातनी विचारसरण्यांचा संघर्ष यामागे प्रामुख्याने दिसून येत आहे.