महिला कधी सुरक्षित होणार ? कोल्हापूर जिल्ह्यात सात महिन्यांत ११० बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:40 PM2024-08-22T16:40:08+5:302024-08-22T16:40:29+5:30

विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचेही प्रमाण चिंताजनक

When will women be safe? 110 rapes in Kolhapur district in seven months | महिला कधी सुरक्षित होणार ? कोल्हापूर जिल्ह्यात सात महिन्यांत ११० बलात्कार

महिला कधी सुरक्षित होणार ? कोल्हापूर जिल्ह्यात सात महिन्यांत ११० बलात्कार

कोल्हापूर : कोलकाता येथील डॉक्टर तरुणी आणि बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराचे ११० गुन्हे नोंद झाले, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या, त्यामुळे महिला कधी सुरक्षित होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.

या गुन्ह्यांमध्ये वाढ

गेल्या सात महिन्यांत बलात्काराचे ११०, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

कुटुंबातही मुली असुरक्षित

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश आरोपी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, ओळखीतील व्यक्ती असतात. अनेकदा असे गुन्हे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत. कौटुंबिक छळाच्याही घटना वाढत आहेत. कुटुंबातच मुली आणि महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षेची सुरुवात कुटुंबापासून होणे गरजेचे आहे.

संस्कार, प्रबोधन गरजेचे

मुली आणि महिलांचा आदर राखणे, त्यांचा सन्मान करण्याचे संस्कार घरातून होणे गरजेचे आहे. पालकांनी विशेष खबरदारी घेऊन मुलांची जडणघडण केल्यास अशा प्रकारचे गुन्हे कमी होऊ शकतात. शाळा आणि महाविद्यालयांनीही यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. तरच ही सामाजिक समस्या कमी होऊ शकेल.

निर्भया पथकांनी आक्रमक व्हावे

निर्भया पथकांकडून सध्या शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी संशयितांवर कारवाया केल्या जातात, मात्र रोडरोमियो आणि हुल्लडबाजांना धडकी भरेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाईत सातत्य असावे. दोषींना शिक्षा झाली तरच असे गुन्हे करण्याचे धाडस कमी होईल. यासाठी ठोस कारवाया गरजेच्या आहेत.

महिलांसंबंधी गुन्ह्यांची आकडेवारी
गुन्हा - दाखल - उघड

खून - ८ - ८
हुंड्यासाठी छळ - २० - २०
बलात्कार - ११० - ११०
विनयभंग - २०५ - २०५
अपहरण - १५८ - १४४

Web Title: When will women be safe? 110 rapes in Kolhapur district in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.