झेंडा कुणाचा? आज फैसला

By admin | Published: November 2, 2015 12:55 AM2015-11-02T00:55:10+5:302015-11-02T00:56:18+5:30

वादावादीचे किरकोळ प्रकार : कोल्हापूर महापालिकेसाठी चुरशीने ६९ टक्के मतदान

Who's the flag? Today's decision | झेंडा कुणाचा? आज फैसला

झेंडा कुणाचा? आज फैसला

Next

कोल्हापूर : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यांमुळे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता अपूर्व उत्साहात आणि अत्यंत चुरशीने ६८.८२ टक्के मतदान झाले. आज, सोमवारी शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी होणार असून महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
महापालिकेची ही निवडणूक केवळ कोल्हापूर शहरावर सत्ता कोणाची, हे ठरविणारी नसून भविष्यातील भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. शहरात सर्वच मतदान केंद्रांबाहेर कोल्हापूरकरांनी गर्दी करून मतदानाचे कर्तव्य पार पाडले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या प्रतिष्ठेची बनविली असल्याने केवळ कोल्हापूर जिल्'ाचेच नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. राजकीय पक्ष तसेच त्यांच्या समर्थकांमधील कमालीची चुरस यांची चुणुक प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होताच दिसून आली. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि अवघ्या अर्ध्या-पाऊण तासातच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. शहरातील ८१ प्रभागांत ही निवडणूक होत असून सर्वच्या सर्व म्हणजे ३७८ मतदान केंद्रांवर मतदारांनी अक्षरश: रांगा लावून मतदान केले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही उत्साह मोठा होता. वयोवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनीही नातेवाइकांचा आधार घेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
कनाननगर प्रभागात खास करून श्रमिक, कष्टकरी वर्ग राहतो. हा वर्ग दुपारनंतर मतदानासाठी केंद्रावर पोहोचला. तसेच ख्रिश्चन समाजाची प्रार्थना असल्याने या समाजातील मतदारही दुपारनंतरच गेले. यामुळे दुपारनंतर तेथे मतदारांची गर्दी उसळली होती.
---------------------------
 

मतदानाची प्रक्रिया संथच
सकाळपासून मतदान केंद्रावर झालेली गर्दी सायंकाळी मतदानाची वेळ संपली तरी कायम होती. दुपारी तुलनेने गर्दी कमी होती; परंतु दुपारी साडेतीननंतर ही गर्दी पुन्हा वाढली. एक केंद्रावर सरासरी १२०० ते १४०० मतदान असल्याने आणि गर्दीच्या तुलनेत मतदानाची प्रक्रिया संथपणे सुरू राहिल्याने ही गर्दी वाढल्याचे दिसत होते. काही मतदान केंद्रांवर मतदानाची गती अगदीच संथ होती; तर काही मतदान केंद्रांवर खोली क्रमांक नीट न कळल्याने मतदारांना एका रांगेतून दुसऱ्या रांगेत उभे राहून मतदान करावे लागले; परंतु त्यामध्ये मतदारांचा वेळ खूप गेला.
 

दिवसभर मतदान केंद्राबाहेर गर्दी
पहिल्या दोन तासांत केवळ पंधरा ते सतरा टक्के मतदान झाले होते, तर दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत ते तीस टक्के झाले. मतदानाची हीच गती कायम राहिली. संपूर्ण दिवसभर सर्वच मतदार केंद्राबाहेर साधारणपणे १०० ते १२५ मतदार रांगेत उभे होेते. त्यांना किमान तास ते दीड तास मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
 

रुईकर कॉलनीत वादावादी
दुपारी रुईकर कॉलनी येथील हिंद विद्यामंदिर केंद्रावर भाजपचे काही कार्यकर्ते डोक्यावर पक्षाची टोपी व गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून गेल्यामुुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. कार्यकर्ते थेट केंद्रात घुसल्याने विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
 

दुबार नावांचा घोळ कायम
शहरातील ८१ प्रभागांत दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या सतरा हजार इतकी आहे. दुबार नावे कमी करण्याचा अधिकार महापालिका अधिकाऱ्यांना नसल्याने ती तशीच यादीत राहिली आहेत; परंतु ज्यांचे नाव दुबार म्हणून नोंदले गेले, त्या मतदारांना घराजवळच्या मतदान केंद्रावर आणि तेही एकाच ठिकाणी मतदान करण्यास परवानगी दिली होती; परंतु काही मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्षांनी अशा दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानच करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे मतदार आणि केंद्राध्यक्ष यांच्यात वाद होत राहिला. विशेषत: साळोखेनगरमधील शिवशक्ती हायस्कूलमध्ये असे प्रकार घडले. बऱ्याच वादानंतर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व केंद्राध्यक्ष यांच्यात नियमांसंदर्भात बोलणे करून दिल्यानंतर अशा मतदारांना मतदान करू देण्यात आले.
दोन नवे प्रयोग यशस्वी
या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने दोन नवीन प्रयोग करून पाहिले. पहिला प्रयोग मतदानावेळी हाताच्या बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईबाबतीत होता. यावेळी पारंपरिक शाई न लावता मार्कर पेनच्या शाईचा वापर केला गेला; तर कसबा बावडा-हनुमान तलाव आणि रुईकर कॉलनी प्रभागातील प्रत्येकी चार मतदान केंद्रांवर मतदारांची बायोमेट्रिक नोंदणी घेण्यात आली. निवडणूक निरीक्षक रूपींदरसिंह, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दोन्ही केंद्रांवर जाऊन याबाबत पाहणी केली.

-------------------------------------------------------------------------------
वेळ संपताच सर्वांना पिटाळले
मतदान केंद्राबाहेर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Who's the flag? Today's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.