सांघिक कामगिरीमुळे जिल्हा परिषदेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:09+5:302021-03-13T04:42:09+5:30
समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ होणार हे ठरलेले, उपोषणाचा इशारा, निलंबनाची मागणी हेदेखील ...

सांघिक कामगिरीमुळे जिल्हा परिषदेची बाजी
समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ होणार हे ठरलेले, उपोषणाचा इशारा, निलंबनाची मागणी हेदेखील नित्याचेच. पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर आरोप हेदेखील नवीन नाही; परंतु असे असले तरी नेमून दिलेल्या कामात तडजोड होत नसल्याने पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा परिषद यशवंत पंचायत राज अभियानामध्ये राज्यात अव्वल ठरली आहे. गेल्यावर्षी दुसरा क्रमांक पटकावलेल्या जिल्हा परिषदेने यंदा पहिला नंबर मिळवत आपल्या कामाची दिशा दाखवून दिली आहे.
हा पुरस्कार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील कामकाजाकरिता आहे. या वर्षातच जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले. आधीचे नऊ महिने भाजप आणि मित्रपक्षांची तर नंतरचे तीन महिने महाविकास आघाडीची सत्ता आली; परंतु पदावर कोणीही असो केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये कोणत्याच पदाधिकारी, सदस्यांची आडकाठी नसते. उलट शक्य त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठबळाची भूमिका गावपातळीपासून घेण्यात येते. यामुळेच जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.
माझ्या मतदारसंघात निधी जादा मिळाला पाहिजे या भूमिकेतून गेल्या दोन-तीन वर्षांत वादावादीचे प्रसंग निर्माण झाले. आरोप-प्रत्यारोप झाले; पण अधिकाऱ्यांनीही त्यांना कितीही धारेवर धरले तरी त्यांच्या विभागाच्या कामकाजात कुचराई केली नाही. म्हणून जिल्हा परिषद राज्यातील पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
पोषण महाअभियान, ताराराणी महोत्सव, जे. पी. नाईक समृद्ध शाळा, ५० हजारांवर विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, सुटीतील अभ्यास, संस्कार शिबिर, दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत १५ हजार ६९५ दिव्यांगांना साहित्य वितरण, १३०० किलो प्लास्टिकचे संकलन, २ लाख आणि ३७ हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, १२५ ट्रॉली, व २४६ घंटागाडी एवढ्या निर्माल्याचे संकलन, ई टपाल ट्रॅकिंग आणि माॅनिरटिंग सिस्टिम, अंगणवाडी प्रवेश वाढवा अभियान, महापुरामध्ये साथीच्या रोगांचा उद्रेक रोखण्यात यश, ३८ पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन, बायोगॅस उभारणीमध्ये देशात पहिला क्रमांक यासारख्या नावीन्यपूर्ण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.
चौकट
आज साखर पेढे वाटप
पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांची शुक्रवारी जयंती. या पूर्वसंध्येला हा निकाल जाहीर झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा परिषदेत चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. याचवेळी जिल्हा परिषद पहिली आल्याबद्दल साखर, पेढे वाटप करण्यात येणार आहे.
कोट
बजरंग पाटील यांचा फोटो वापरावा
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण कामावर या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. माझ्या कारकीर्दीत जाहीर झालेला पुरस्कार हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटणारा आहे.
बजरंग पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर
कोट
हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरणे
मी विजेत्या तीनही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे अभिनंदन करतो. विविध योजना चांगल्या पद्धतीने राबवून, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून वेगळेपण दाखवणारी अशी ही जिल्हा परिषद आहे. त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श अन्य जिल्हा परिषदांनी घेण्याची गरज आहे.
हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री