लातूरच्या बाजारात सोयाबीनचे दोनशे रुपयांनी भाव उतरले! दर वाढणार का? शेतकऱ्यांना प्रश्न

By हणमंत गायकवाड | Published: December 16, 2023 12:06 PM2023-12-16T12:06:39+5:302023-12-16T12:07:12+5:30

अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे.

In the Latur market, the price of soybeans fell by two hundred rupees! Will rates rise? Question to farmers | लातूरच्या बाजारात सोयाबीनचे दोनशे रुपयांनी भाव उतरले! दर वाढणार का? शेतकऱ्यांना प्रश्न

लातूरच्या बाजारात सोयाबीनचे दोनशे रुपयांनी भाव उतरले! दर वाढणार का? शेतकऱ्यांना प्रश्न

लातूर : यंदा सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची निराशाच केली असून, रब्बीची पेरणी होऊन काढणीला पिके आले तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांत पुन्हा दोनशे ते अडीचशे रुपयांनी क्विंटलमागे दरात घट झाली आहे. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आणखीन विक्रीला सोयाबीन नेले नाही, त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये १३,८९३ सोयाबीनची आवक होती, तर सर्वसाधारण दर ४,८५० निघाला. यामुळे यंदा सोयाबीनचा दर वाढणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे ऊस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला तर उसाकडे शेतकरी वळतात. पावसाच्या पाण्यावरच पीक काढायचे असेल तर सोयाबीन घेतले जाते. त्यानुसार जिल्ह्यात कालच्या हंगामामध्ये साडेचार लाख हेक्टर सोयाबीनचा पेरा झाला होता. पाऊस असा तसाच असला तरी बऱ्यापैकी उत्पन्न झाले आहे; मात्र दर मिळत नाही. प्रत्येक क्विंटल पाच हजार शंभरच्यावर यंदा सोयाबीनचा दर गेलेला नाही. त्यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे. परंतु, किती दिवस साठा करून ठेवावा. दर कधी वाढणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

बाजार समितीत शेतमालाची आवक
लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालाची आवक आहे.

गूळ : ३९४
गहू : ८८
ज्वारी हायब्रीड : ०५
ज्वारी पिवळी : ०८
हरभरा : ४०३
तूर : १४१
उडीद :८९
करडई :२७
धने : ०५

सर्वाधिक नऊ हजार रुपये क्विंटल तुरीला दर
लातूरच्या बाजारामध्ये सर्वाधिक तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे, तर त्या खालोखाल आठ हजार रुपये प्रति क्विंटल उडीदाला भाव आहे. पण, या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे त्यांना या दराचा फायदा होत नाही, अशी स्थिती आहे. हरभऱ्यालाही जरा थोडा चांगला दर आहे. पाच हजार ५०० रुपये सर्वसाधारण प्रती क्विंटल हरभरा लातूरच्या बाजारात विकला जातोय. सोयाबीनची आवक १३,८९३ आणि सर्वसाधारण दर ४,८५० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकरी सोयाबीनचा दर कधी वाढेल, या आशेवर होते. मात्र, यंदा दर वाढला नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे.

Web Title: In the Latur market, the price of soybeans fell by two hundred rupees! Will rates rise? Question to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.