शुद्ध हवा गरजेची, लातूरात धुळीच्या प्रतिबंधासाठी पाण्याचे १० कारंजे; फॉगकॅनन वाहनही मदतीला
By हणमंत गायकवाड | Updated: March 12, 2024 16:58 IST2024-03-12T16:57:44+5:302024-03-12T16:58:58+5:30
लातूर महानगरपालिकेने वायुप्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.

शुद्ध हवा गरजेची, लातूरात धुळीच्या प्रतिबंधासाठी पाण्याचे १० कारंजे; फॉगकॅनन वाहनही मदतीला
लातूर : शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, याकरिता महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात असून, विविध ठिकाणी कारंजे तसेच उद्यानांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी शहरात दहा ठिकाणी पाण्याचे कारंजे उभारण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांवरून उडणारी धूळ कमी होण्यास मदत होत आहे. तसेच फॉग कॅनन वाहनाचीही झाडावर तसेच इमारतीवरील धूळ कमी करण्यासाठी मदत घेतली जात आहे.
वायुप्रदूषण हे सध्या सर्वांत मोठे पर्यावरणीय आव्हानांपैकी एक आहे. भारतासारख्या देशासाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्यचिंतेच्या विषयांपैकी वायुप्रदूषण हा एक विषय आहे. म्हणून शुद्ध हवा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी लातूर महानगरपालिकेने वायुप्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार शुद्ध हवा मिळावी यासाठी शहरात पाण्याचे दहा कारंजे उभारण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे रस्त्यावरील धूळ उडून ती वातावरणामध्ये पसरण्यास प्रतिबंध होतो आहे. घनकचरा, बांधकाम कचरा तसेच जुना कचरा प्रक्रिया करण्यावरही भर दिला जात आहे.
कारंजाचे पाणी हवेतील प्रदूषकांना पकडते
कारंजाचे पाणी हवेतील प्रदूषकांना पकडते. धरून ठेवते. धूळ प्रसारित होण्यापासून प्रतिबंध करते. हे निगेटिव्ह आयनांच्या निर्मितीमुळे होते. जे नंतर हवेत उत्सर्जित केले जातात. वायुप्रदूषकांना पकडून ठेवतात. जेव्हा पाण्याच्या वैशिष्ट्यांमधून बाष्पीभवन होत, तेव्हा निगेटिव्ह घटक सोडले जातात. हे निगेटिव्ह आयन हवा शुद्ध करतात. श्वास घेण्यास अधिक ताजेतवाने करतात. म्हणून लातूर शहरात महापालिकेने दहा ठिकाणी पाण्याचे कारंजे उभारले आहेत. सायंकाळच्या वेळी कारंजांच्या परिसरात वातावरण उत्साहित झालेले दिसते.
जागेचे सुशोभीकरण अन् शीतकरण प्रभाव
एक किंवा अधिक कारंजे वापरल्याने सार्वजनिक उद्यानामध्ये नैसर्गिक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. शीतकरण प्रभाव पडतो. शहराच्या शहरीकरणामुळे इमारती, फुटपाथ आणि त्यामुळे उष्णता शोषून टिकून ठेवल्याने स्थानिक तापमानात वाढ होऊ शकते. म्हणून पाण्याचे कारंजे शहरी उष्णतेच्या चौकातील प्रभाव कमी करण्याची भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच महापालिकेने उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी कारंजे उभारले आहेत.
वॉटर मिस्ट, फॉग कॅनन वाहन
शहरातील वातावरणात मिसळणारा धूर, धुलिकण, झाडावरची धूळ हवेत तरंगणारे डस्ट पार्टिकल यांचे प्रमाण कमी करण्यासाठी फॉग कॅनन वाहनाचा उपयोग केला जात आहे. यामुळे दहा ते बारा टक्के डस्ट पार्टिकल कमी करण्यात मदत झाली आहे. या मशिनद्वारे दररोज रात्री शहरातील रस्ते, झाड व वातावरणातील धुलिकण कमी करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. याद्वारे सहा ते दहा हजार लिटर पाणी फवारले जाते.