१0 टक्केच लाचखोरांवर दोषारोपपत्र!
By admin | Published: July 28, 2014 04:03 AM2014-07-28T04:03:41+5:302014-07-28T04:03:41+5:30
लाचखोर अधिकारी रंगेहात पकडला...अशा आशयाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना दिल्या जातात
सुदाम देशमुख, अहमदनगर
लाचखोर अधिकारी रंगेहात पकडला...अशा आशयाच्या बातम्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमांना दिल्या जातात. मात्र लाचखोर अधिकाऱ्याला अटक होते, तो जामिनावर सुटतो...आणि काही काळानंतर समाजात उजळ माथ्याने फिरू लागतो. त्याचे कोणालाच सोयरसुतक राहत नाही. नंतर तपास थंड होतो. प्रकरणाचे पुढे काय होते....तर काहीच नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात पकडलेल्या लाचखोरांपैकी फक्त १० टक्के अधिकाऱ्यांवर दोषारोपपत्र दाखल झाले आहे. ही प्रकरणेही पुढे सरकली नाहीत.
लाचखोरांच्या ७० टक्के प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. त्यामुळे लाचखोर अधिकारी-कर्मचारी उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. २०१३-१४ मध्ये आतापर्यंत राज्यात ७०४ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २८ कर्मचाऱ्यांची अपसंपदा जप्त करण्यात आली. अन्य भ्रष्टाचाराची २८ प्रकरणे आहेत. ७०४ गुन्ह्यांमध्ये ४८४ प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. म्हणजे जवळपास ७० टक्के प्रकरणांमध्ये तपास अपूर्ण आहे. अभियोगपूर्व मंजुरीकरिता १२२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ७१ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून त्याचाही अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.