सागरी मत्स्यशेतीसाठी २३ पिंजऱ्यांची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 10:44 PM2016-09-06T22:44:42+5:302016-09-06T23:44:57+5:30

निधीची प्रतीक्षा : प्रकल्प आढाव्यासाठी हैदराबादला होणार बैठक

23 piggery preparedness for marine aquaculture | सागरी मत्स्यशेतीसाठी २३ पिंजऱ्यांची सज्जता

सागरी मत्स्यशेतीसाठी २३ पिंजऱ्यांची सज्जता

Next

प्रकाश वराडकर --रत्नागिरी -जगभरात सागरी मत्स्य उत्पादनात घट होत असताना मत्स्य उत्पादन वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. कोकणातील अरबी समुद्रात रत्नागिरी येथेही हा प्रयोग २०१४मध्ये करण्यात आला. त्यात फारसे यश आले नसले तरी आता नव्या दमाने महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, दापोली कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालयाच्या सहकार्याने भगवती बंदराजवळील समुद्रात हा प्रकल्प पुन्हा राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी २३ पिंजऱ्यांची सज्जता केली आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल फिशिंग डेव्हलपमेंट बोर्डाकडून निधीची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाच्या तांत्रिक सहकार्यावर व स्थानिक मच्छिमारांच्या सहभागातून हा प्रकल्प १९ डिसेंबर २०१४ रोजी सुरू करण्यात आला होता. त्यासाठी मिरकरवाडा ते भगवती बंदर दरम्यानच्या समुद्रात किनाऱ्यापासून २०० मीटर अंतरावर पाण्यात अर्धे बुडालेले व काही भाग पाण्यावर असलेले १२ मोठे पिंजरे उभारण्यात आले होते. त्यामध्ये काही लाख रुपयांचे जिताडा व मोडोसा मच्छीचे बीज सोडण्यात आले होते. मात्र, काही त्रुटींमुळे हा प्रयोग फसला. ७५० ग्रॅम वजनाचे २३२ किलो मासे मिळाले होते. त्यामुळेच २०१५ मध्ये हा प्रकल्प त्रुटी दूर करून यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक निधी न मिळाल्याने २०१५मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
मत्स्योद्योग विकास मंडळाच्या माध्यमातून दापोली कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालयाच्या तांत्रिक सहकार्याने हा प्रकल्प २०१६मध्ये राबविण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पिंजऱ्यातील मत्स्यशेती अर्थात केज फिशिंग कल्चर कोकणात रूजविण्यास पोषक स्थिती आहे. याचा अभ्यास करूनच ही मत्स्यशेती कोकणच्या सागरी किनाऱ्यावर राबवून मत्स्य उत्पादनात वाढ करणे, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. त्यामुळे रत्नागिरीत हा प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणेमार्फत पिंजऱ्यातील मत्स्यशेतीसाठी नवीन १२ पिंजरेही तयार करण्यात आले आहेत. सन २०१४मध्ये प्रकल्पासाठी वापरलेले १२पैकी ११ पिंजरेही प्रकल्पासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. यंदा हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रकल्पाचा आढावा घेण्याकरिता येत्या ७ सप्टेंबरला हैदराबाद येथे रत्नागिरीतील प्रकल्प संबंधितांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.


रत्नागिरीत सर्वप्रथम प्रयोग
तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कोकणच्या सागरी हद्दीत हा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रोत्साहन दिले होते. जगभरात पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचे असंख्य प्रकल्प अस्तित्त्वात आहेत. त्यातून खात्रीशीर मत्स्य उत्पादनही मिळत आहे. त्यामुळेच सर्वप्रथम रत्नागिरीच्या समुद्रात पिंजऱ्यातील मत्स्यशेती हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हा प्रकल्प राबवल्यानंतर यशस्वी होणार काय, याची चर्चा मच्छीमारांमध्ये सुरू आहे.
खासगी स्तरावरही मत्स्यशेती लाभदायी
पर्ससीन व पारंपरिक मच्छीमारांमध्ये क्षेत्रावरून वाद आहेत. त्यामुळे पर्ससीन मच्छीमारीला केवळ चार महिने मच्छीमारीसाठी परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या मच्छीमारांनीही पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचे प्रकल्प राबवल्यास त्यातून अधिक प्रमाणात मत्स्य उत्पादन घेतले जाऊ शकेल. मच्छीमारांच्या उत्पन्नातही त्यामुळे भर पडेल, असे जाणकारांना वाटते आहे.

Web Title: 23 piggery preparedness for marine aquaculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.