भारतातून ४२ हजार टन द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 07:30 PM2017-03-02T19:30:48+5:302017-03-02T19:30:48+5:30

भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली असून सध्या द्राक्ष हंगाम बहरात असून निर्यातक्षम द्राक्षाची मागणी युरोप

42 thousand tons of grapes exported from India | भारतातून ४२ हजार टन द्राक्षांची निर्यात

भारतातून ४२ हजार टन द्राक्षांची निर्यात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

निफाड (नाशिक), दि. 02 - भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली असून सध्या  द्राक्ष  हंगाम बहरात असून निर्यातक्षम द्राक्षाची मागणी युरोप, रशिया आदी ठिकाणी असल्याने यावर्षी  आतापर्यंत २३.७१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी निर्यातक्षम द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्षनिर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामात विशेषत: महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षाला सुरुवातीला  १०० रूपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. आता मात्र चिली हा देशही सध्या द्राक्ष निर्यात करीत असल्याने पांढरे द्राक्ष ५० ते ६० रु पये व काळी द्राक्ष ६० ते ७० रूपये सरासरी भावाने निर्यात होत आहे. सुरुवातीला काही निर्यातदारांनी साखर कमी असूनही माल पाठवला. परिणामी तेथील मार्केटमध्ये अपप्रचार होऊन आणि शिवाय चिलीचा माल स्पर्धेत असल्याने अवघ्या ३० दिवसात भाव निम्म्याने खाली आले. युरोपमध्ये तरी भाव सरासरी टिकून आहे. रशियात ते ४० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. असे असले तरी मार्च अखेरपर्यंत चिलीचा माल संपेल आणि तपमान असेच  वाढत गेले तर द्राक्षांना मागणी वाढून भारतीय द्राक्षाला दरही चांगला मिळेल फक्त कोणतेही नैसर्गिक संकट या काळात  यायला नको असा आशावाद अखिल   भारतीय  द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे यांनी व्यक्त केला. फक्त द्राक्ष उत्पादकांनी घाई न करता संयमाने घ्यावे ८ ते १० दिवसात मार्केटमध्ये पुन्हा तेजी येऊ शकेल.

मागील वर्षी युरोपमध्ये ८४ हजार मे टन निर्यात झाली होती. आताच्या घडीला ती ४२ हजार १०४ मे टन इतकी असून यंदाच्या हंगामात ती ९० हजार मे टन च्याही  पुढे जाईल असा अंदाज खापरे यांनी व्यक्त केला. साधारणत: युरोप बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक निर्यात रशिया मध्ये झाली आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीत तब्बल २५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात जवळपास ५६ हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड झाली असल्याची नोंद आहे. गेल्या हंगामात एक लाख आठ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. त्यापैकी ७५ हजार टन द्राक्ष हे युरोपमध्ये आणि ३३ हजार टन द्राक्ष रशिया ,बांगलादेश,दुबई या देशात करण्यात आली आहे.

Web Title: 42 thousand tons of grapes exported from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.