राज्यात ५३ हजार मुली शाळाबाह्य
By admin | Published: January 3, 2015 12:37 AM2015-01-03T00:37:41+5:302015-01-03T00:53:53+5:30
गळती घटल्याचा शिक्षण विभागाचा दावा.
अकोला : राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत असून, त्यामुळे शाळांमधून मुलींची गळती घटली असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असला तरी, राज्यात ५३ हजार मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही दूरच आहेत.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून ३ जानेवारी २0१४ पासून लेक शिकवा अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर झाला असून, अनेक मुली शिकू लागल्या आहेत. या अभियानामुळे मुलींच्या शाळा गळतीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. सद्यस्थितीत मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणाकडे नजर टाकली, तर असे लक्षात येते की, प्राथमिक शिक्षण विभागात मुलींच्या गळतीचे प्रमाण तीन टक्के, तर माध्यमिक शिक्षण विभागात हे प्रमाण सात टक्के आहे. यापूर्वी हे प्रमाण प्राथमिकस्तरावर ८ टक्के तर माध्यमिक स्तरावर १५ टक्के होते. दोन्ही मिळून १३ टक्के गळती कमी करण्यात शिक्षण विभागाला यश आले असल्याचा दावा शिक्षण संचालनालयाने केला आहे.
लेक शिकवा अभियानात मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोफत गणवेश व पाठय़पुस्तके देण्यात येत आहेत. दिवसाला एक रुपया याप्रमाणे भत्ता देण्यात येतो. परिणामी मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत ६५ हजार मुली नियमितपणे शाळेत उपस्थित राहू लागल्या आहेत, असा शिक्षण विभागाचा दावा आहे. असे असले तरी अद्यापही ५३ हजार मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही.
राज्यात प्राथमिक व माध्यमिक मिळून मुलींच्या गळतीचे प्रमाण १३ टक्यांनी कमी झाले आहे. ६५ हजार मुली आता नियमितपणे शाळेत उपस्थित राहू लागल्या आहेत. मुलींचे प्रमाण आणखी वाढावे व गळती कमी व्हावी, यासाठी दैनंदिन भत्ता एक रुपयांवरुन पाच रुपये करण्याची मागणी शासनाकडे केली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने सांगीतले.