दहा जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरला फटका; आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 02:00 PM2024-10-24T14:00:08+5:302024-10-24T14:01:10+5:30

पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात

95 thousand hectares affected in ten districts; Diwali of farmers without help due to code of conduct | दहा जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरला फटका; आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी

दहा जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरला फटका; आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. राज्यात १ ते २१ ऑक्टोबरपर्यंत १० जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका बसला.  सध्या आचारसंहिता असल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात दुरापास्त झाला आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ९४ हजार ५४३ हेक्टरवरील पिकांचे  नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अहवालात नोंद नसल्याने शेतकरी संतप्त

या पावसामुळे सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला असून, जिल्ह्यातील ६४ हजार ९०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागांमध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक, नंदूरबार, सांगली, बुलढाणा व भंडारा या १० जिल्ह्यांमधील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे तसे, विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांमधील पिकांचेही खूप नुकसान झाले असून त्याबाबत अहवालात नोंद नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

शेतकरी त्रस्त अन् नेते निवडणुकीत व्यस्त

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पंचनाम्यांचे काम जवळपास बंद आहे. त्यामुळे पंचनाम्यांचा अहवाल राज्य सरकारकडे पोहचून त्यावर निर्णय केव्हा होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पंचनाम्यानंतर जाहीर करण्यात येणारी मदत आचारसंहितेत अडकणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हातचे पीक तर गेलेच मात्र, मदतही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा कडू होणार आहे.

परतीच्या पावसामुळे राज्यात काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कीड रोगांमध्येही वाढ झाली आहे.

नुकसानीची आकडेवारी

जिल्हा    क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ठाणे    ५४१.४० 
  • पालघर    २७२३.४१ 
  • रायगड    ४७१.१० 
  • रत्नागिरी    ९५.२० 
  • सिंधुदुर्ग    ६५९२ 
  • नाशिक    ६४९०२.७६ 
  • नंदूरबार    २७९.८५ 
  • सांगली    २४२४.३० 
  • बुलढाणा    १५२३३.७० 
  • भंडारा    १२८०

Web Title: 95 thousand hectares affected in ten districts; Diwali of farmers without help due to code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.