लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:20 AM2024-09-30T11:20:25+5:302024-09-30T11:21:51+5:30

लाडकी बहीण योजनेमुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याचा भरवसा नाही असं विधान गडकरींनी केल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. 

A statement by Nitin Gadkari on Ladki Bahin Yojana; Sanjay Raut, Supriya Sule Target on BJP and Mahayuti Government | लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. मात्र या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. काहीजण या योजनेविरोधात कोर्टातही गेलेत. महायुतीची ही योजना महिला मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतात. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. राज्य सरकार पैशांचा अपव्यय करतंय, केंद्राची काही जबाबदारी आहे की नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 

गडकरींच्या या विधानावर संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी नसून उद्याच्या निवडणुकीत शिंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मते विकत घेण्याची योजना आहे. लाडक्या बहिणीवर फार प्रेम उफाळून आले असे नाही. त्यासाठी इतर सर्व योजनांचे, प्रकल्पांचे पैसे या फक्त एका लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. या योजनेवरून सत्तेतल्या तिन्ही गटात मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लाडक्या बहिणीचा डेटा घेऊन त्यांना पत्र पाठवलं, त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे. गडकरी म्हणतायेत ते बरोबर आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जर अशाप्रकारे पैशाचा अपव्यय सुरू असेल. तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही. केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांचे काही कर्तव्य आहेत की नाही. देशाचं आर्थिक नियोजन करताना कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तरच हा देश पुढे जाईल. नितीन गडकरी हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडायला हवा असा टोलाही राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चिंतेची बाब

नितीन गडकरींना आमच्या सर्वांपेक्षा नक्कीच आतमधली जास्त माहिती असणार आहे. त्यामुळे नितीन गडकरी जे बोलतात. महाराष्ट्रातील जे नेते महायुतीसोबत होते राज ठाकरे हेदेखील तेच बोलले होते. सातत्याने अनेक चॅनेल आणि वर्तमानपत्रात जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अडचणीत असल्याचं सांगितले जाते. जर सरकारमधील लोक असे बोलत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने जयंत पाटील हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनातही जयंत पाटील सविस्तर बोललेत. महाराष्ट्राचं अर्थखाते अनेकवेळा आक्षेप घेते मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेटून निर्णय घेतले जातात. गेल्या ५ दशकापासून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली राहिली आहे. पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती उद्धभवली आहे त्याला महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपूर येथील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी लाडकी बहीण योजनेवर त्यांच्या शैलीत भाष्य केले. गडकरी म्हणाले की, सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. लाडकी बहीण योजना आली आहे. त्यामुळे अनुदानाचा पैसा तिथेही द्यावा लागतो असा सल्ला त्यांनी गुंतवणूकदारांना दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारला टीकास्त्र सोडलं आहे. 

Web Title: A statement by Nitin Gadkari on Ladki Bahin Yojana; Sanjay Raut, Supriya Sule Target on BJP and Mahayuti Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.