सात वर्षांनंतरही जिल्ह्यात मनसेची बाल्यावस्था कायम

By admin | Published: October 20, 2014 10:08 PM2014-10-20T22:08:10+5:302014-10-20T22:28:21+5:30

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलेले नाही,

After seven years, MNS's childhood in the district continued | सात वर्षांनंतरही जिल्ह्यात मनसेची बाल्यावस्था कायम

सात वर्षांनंतरही जिल्ह्यात मनसेची बाल्यावस्था कायम

Next

रत्नागिरी : मोठ्या डामडौलात स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेइतके नाही, पण शिवसेनेच्या खालोखाल यश मिळेल, अशी अटकळ मनसेच्या स्थापनेप्रसंगी केली जात होती. मात्र, मनसेचे कोकणाकडे असलेले दुर्लक्ष आणि मनसे स्वतंत्र झाल्यानंतरही न फुटलेली शिवसेना यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेला मतांमधील आपला वाटा वाढवता आलेला नाही. त्यादृष्टीने मनसे अजूनही बाल्यावस्थेतच आहे.कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेला सर्वात मोठे यश प्रथम कोकणानेच मिळवून दिले. याच शिवसेनेतून मनसे वेगळी झाली. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच ठाम राहिले. शिवसेनेतून एकही मोठा पदाधिकारी मनसेकडे वळला नाही. त्यामुळेच कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेची वाढ झाली नाही. शिवसैनिकांनी पक्ष बदलला नाही. या कारणाबरोबरच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलेले नाही, हेही तेवढेच खरे. त्यामागची समीकरणे अजून फारशी स्पष्ट झालेली नाहीत. पण, त्यांनी कोकणात आपला पक्ष वाढवण्यासाठी कोणताही विशेष प्रयत्न केलेला नाही, हे खरे आहे.
पक्षाकडून दुर्लक्ष होत असतानाही कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी एका बाजूने मनसे वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अडीअडचणीला धावून जाणे, महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये पुढाकार घेणे, या त्यांच्या कामामुळे खेड आणि लगतच्या दापोलीमध्ये मनसेने थोडे हातपाय पसरले. त्यामुळे खेड नगर परिषद आणि दापोली नगरपंचायतीत मनसेने आपला वाटा मिळवला. पण, मनसेची ही घोडदौड फार काळ सुरू राहिली नाही. कारण मनसेकडे तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस अत्यंत क्षीण झाली आहे. तरीही ग्रामीण भागात आजही काँग्रेसकडे थोडेफार कार्यकर्ते सापडतात. मनसेची अवस्था त्याहीपेक्षा खराब आहे. मनसेकडे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे कार्यकर्तेच नाहीत. केवळ तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत, तर अनेक ठिकाणी पुरेसे पदाधिकारीही नाहीत. जे आहेत, त्यांच्यासमोर कसलाही कार्यक्रम नाही. पक्षाकडून सदस्य नोंदणीची मोहीम नाही.
२00९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने रत्नागिरी जिल्ह्यात पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. दापोली मतदार संघात संतोष शिर्के यांनी १२ हजार ४८१ मते मिळवली होती. गुहागर मतदार संघात वैभव खेडेकर यांनी ६ हजार ८६0 मते घेतली. चिपळुणात सूर्यकांत साळुंके यांनी १0 हजार ६४२ मते मिळवली. रत्नागिरीत अ‍ॅड. संकेत घाग यांनी ५ हजार ६१७ मते मिळवली. राजापुरात अविनाश सौंदळकर यांनी ५ हजार ३९0 मते मिळवली. म्हणजेच २00९ साली रत्नागिरी जिल्ह्यात मनसेला ४0 हजार ९९0 मते मिळाली होती. निवडणुकीनंतर यातील थोडेच जण मनसेमध्ये कार्यरत राहिले. बाकीच्यांनी मनसे आणि राजकारण दोन्ही सोडून दिले.
गतनिवडणुकीत जिल्ह्यात ४0 हजार मते पडलेली असतानाही या निवडणुकीत मनसेने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार केला नाही. यावेळी केवळ दापोली मतदार संघातच आपला उमेदवार उभा केला. कोकण विभागीय संघटक म्हणून काम करणाऱ्या खेडच्या वैभव खेडेकर यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवली. गतवेळी ते खेड मतदार संघात उभे होते. यावेळी त्यांनी खेड मतदार संघ सोडून दापोलीमधून उमेदवारी दाखल केली. मात्र, तेथे त्यांना केवळ ८ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. गतवेळी याच मतदार संघात मनसेला १२ हजाराहून अधिक मते मिळाली होती. यावेळी त्यात घट झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेला गुहागर मतदार संघात मनसे कार्यकर्त्यांनी ‘नोटा’चा वापर करण्याची भूमिका घेतली होती. पण नोटाचा वापर तेवढा दिसत नाही. मनसेची संघटनात्मक वाढ झालेली नाही, वैभव खेडेकर यांच्यानंतरच्या फळीत सक्षम नेतृत्त्व नाही. त्यामुळे मनसेची वाढ होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. समाजोपयोगी कामांमध्ये सहभाग नसल्यामुळे मनसे लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. स्थापनेनंतर पहिली एक-दोन वर्षे मनसेमध्ये हलचल दिसली होती. पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ही हलचल पूर्णपणे थंडावली. त्यामुळेच २00९मध्ये पाच ठिकाणी लढून ४0 हजार मते मिळवणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकाच मतदार संघात लढून ८ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: After seven years, MNS's childhood in the district continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.