देशात डाळ सोडून सर्व स्वस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 05:19 AM2016-08-24T05:19:27+5:302016-08-24T05:19:27+5:30
देशात कोणतीही महागाई नसून डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी येथे केले.
नागपूर : देशात कोणतीही महागाई नसून डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी येथे केले. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना गंगवार यांनी केलेल्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भूमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या समर्थनार्थ नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशात डाळ सोडली तर गहू, तांदूळ, तेल इत्यादी गोष्टी स्वस्त आहेत. डाळीचे उत्पादनच कमी झाले आहे. डाळीच्या पिकाचे नीलगाय तसेच इतर जनावरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे किमती वाढलेल्या आहेत. परंतु उत्पादन वाढवून आणि आयात केल्याने डाळीच्या किमती नियंत्रित होऊ शकतात. डाळीच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी ऊर्जित पटेल यांची झालेली निवड योग्यच आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. रघुराम राजन यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना हटविण्यात आलेले नाही. ऊर्जित पटेल देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतील, असा विश्वासही गंगवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
>जावडेकरांच्या वक्तव्यावर मौन
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यलढ्यात फासावर गेले होते, असे वादग्रस्त वक्तव्य दिले होते. यावर गंगवार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
>‘जीएसटी’ विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाले आहे. आसाम व बिहार या दोन राज्यांच्या विधानसभेतदेखील याला मंजुरी मिळाली आहे. इतर राज्यदेखील याबाबतीत सकारात्मक असून, दोन महिन्यांत सर्व राज्यांतून मंजुरी मिळेल. - संतोष गंगवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री