जळगाव जिल्ह्यासाठी अमृतमय "गिरणा"माय

By admin | Published: July 4, 2017 08:24 AM2017-07-04T08:24:18+5:302017-07-04T08:24:18+5:30

भूमिपुजनानंतर १४ वर्षात काम पूर्ण ; १० वेळा शंभर टक्के जलसंचय

Amritma "Jalna" Myel for Jalgaon District | जळगाव जिल्ह्यासाठी अमृतमय "गिरणा"माय

जळगाव जिल्ह्यासाठी अमृतमय "गिरणा"माय

Next

जिजाबराव वाघ/ऑनलाइन लोकमत 
जळगाव (चाळीसगाव), दि. 4 - गिरणा तेरा पाणी अमृत... संथ वाहते गिरणामाई अशा गौरवोद्गारामुळे गिरणा धरणाचा गोडवा जळगाव जिल्ह्याच्या प्रांतातून वाहतो. जिल्ह्याच्या पाऊण भागाची अर्थात जवळपास २०-२५ लाख लोकसंख्येची तहान भागवणारे हे धरण वरदानही ठरले आहे.


सद्यस्थितीत धरणात २५ टक्के जलसाठा आहे. चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० कि.मी.वर नांदगाव तालुक्यात महाकाय गिरणा धरण आहे. गिरणा प्रकल्प नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. यामुळेच जिल्ह्यासाठी गिरणाची धार अमृतमय ठरलीय. गिरणा धरणामुळे गिरणा खोऱ्याला हिरवा साज चढलाय.


१९५५ मध्ये सुरुवात १४ वर्षात पूर्ण
जलसिंचन प्रकल्पाच्या कोनशीला दिमाखात उभ्या राहतात. शुभारंभाचा धुराळाही उडतो. प्रत्यक्षात वर्षानुवर्ष काम पूर्ण होतच नाही. गिरणा धरण याला अपवाद ठरावे. १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारला गेला. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले.


६ कोटीत उभारले गेले गिरणा

२९ हजार ५०० दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे गिरणा धरण आहे. प्रकल्पांसाठी १३ कोटी रुपये खर्ची झाले आहेत. १ हजार ४०० फूट दगडी तर १ हजार ७६० मातीचे बांधकाम आहे. धरणाची नदीपातळीपासूनची उंची १३३ इंच तर समुद्रसपाटीपासून १३१८ इंच असून १८ हजार ५०० उपयुक्त तर ३ हजार दशलक्ष घनफूट मृतसाठा निर्धारित केला आहे. १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात धरणाचा विस्तार व्यापला असून १ लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवळ प्रदान केली आहे. कालव्यामुळे २ लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली येते.


एकूण ४ कालवे
५३ कि.मी.चा पांझण डावा कालव्यासह जामदा उजवा २० कि.मी., जामदा डावा ४० तर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचे आहेत. या कालव्यांमुळे गिरणा खोऱ्याला सुपीकता व समृध्दता लाभलीय. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत आहे.


१० वेळा १०० टक्के भरले
१९६९ मध्ये गिरणा धरणाची चाचणी झाली. पहिल्याच वर्षी ८८ टक्के भरले. यानंतर १९७३, १९७६, १९८०, १९९४, २००४, २००७, २००८ असे १० वेळा ते ओव्हरफ्लो झाले. गेल्यावर्षी ते ९१ टक्के भरले.


२०१५ मध्ये भीषण पाणीबाणी
२०१५ मध्ये भयावह दुष्काळीस्थिती असल्याने गिरणा धरणाची पाणीपातळी अत्यल्प राहिली होती. यामुळे जळगाव जिल्ह्यात भीषण पाणीबाणीचे जलसंकट ओढवले. यावर्षी ३ हजार दशलक्ष घनफूट या मृतसाठ्यातून आवर्तन देण्याची वेळ आली. गिरणावर अवलंबून असणाऱ्या गावांवर पाणीकळाच पसरली होती.


१२७ पाणीपुरवठा योजनांचा स्त्रोत
मालेगाव शहर, चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाणी स्त्रोत आहे. मात्र याच योजनांद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास पाऊण भागातील लोकसंख्येची तृष्णा शांती होते. बिगर सिंचनासाठीधरणाचे पाणी दहिगाव बंधारपर्यंत प्रवास करते. पिण्यासाठी २ महिन्याच्या अंतराने आवर्तन सोडण्यात येते. यावर्षी सिंचनासाठी प्रत्येकी २ हजार क्यूसेसचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये आवर्तने सोडण्यात आले.


धरणाच्या वरील भागात ४ जलप्रकल्प
गिरणा धरणाच्या वरील भागात चणकापूर, केळझर, हरणबारी, पुनंद असे चार मध्यम जलप्रकल्प आहेत. पावसावळ्यात हे चारही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यावर गिरणा धरणात मोठ्या प्रमाणातर जलसाठा येण्यास सुरुवात होते. गतवर्षी पाणीबाणी असताना आमदार उन्मेष पाटील यांनी समन्यायी पाणी वाटप मुद्याला हवा दिली होती. त्याचे पडसाद नाशिकसह जळगाव जिल्ह्यातही ठळकपणे उमटले होते.


सद्यस्थिती २५ टक्के जलसाठा
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणात ९१ टक्के जलसाठा झाला. सद्यस्थितीत ४ हजार ७०० दशलक्ष घनफूट म्हणजे अवघा २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Web Title: Amritma "Jalna" Myel for Jalgaon District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.