‘अॅपल’चे टिम कूक सिद्धिविनायकाच्या चरणी!
By admin | Published: May 19, 2016 05:53 AM2016-05-19T05:53:31+5:302016-05-19T05:53:31+5:30
सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी सकाळी तीन-चार आलिशान गाड्यांचा ताफा आला आणि त्यातून चक्क अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम उतरले.
मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी सकाळी तीन-चार आलिशान गाड्यांचा ताफा आला आणि त्यातून चक्क अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम उतरले. खरे तर सिद्धिविनायकाच्या मंदिरात परदेशी नागरिकांचे येणे नवीन नाही. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश हेही त्यांच्यासोबत दिसले तेव्हा कुणीतरी व्हीव्हीआयपी आल्याची जाणीव सर्वांना झाली. आकाश यांच्यासोबत असलेली व्यक्ती ही ‘अॅपल’ कंपनीची सीईओ टिम कूक आहे, ही घटना मुंबईत ‘टॉक आॅफ द टाऊन’ झाली.
मंगळवारी रात्री चीनहून खासगी विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर ताजमहाल हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी गेलेल्या कूक यांच्यासाठी ‘ग्रँड लक्झरी सूट’ सज्ज होता. बुधवारी प्रमुख कंपन्यांच्या सीईओसोबत ब्रेकफास्ट करत असतानाच आकाश अंबानी ताजमध्ये आले आणि मग कूक यांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचले.
दिवसभर व्होडाफोन कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांपासून सायरस मिस्त्री आणि अनेक मोठ्या उद्योगपतींना भेटल्यानंतर रात्री उशिरा टिम कूक हे विख्यात अभिनेते शाहरूख खान यांच्या ‘मन्नत’ बंगल्यावर खास निमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीत उपस्थित राहिले. कूक गुरगाव, दिल्ली आणि हैदराबाद येथे भेट देणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)
बंगलोरमध्ये अॅपलचे अॅप निर्मिती केंद्र
कंपनीच्या ‘आयओएस’ या आॅपरेटिंग सिस्टीमवर चालतील अशा विविध लोकोपयोगी अॅपच्या निर्मितीसाठी कंपनीने बंगलोर येथे अॅप विकास केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.
>भेटीचे महत्त्व काय आहे ?
अॅपलला भारतात त्यांचे ‘सेकंड हँड’ फोन विकण्याची अनुमती हवी आहे. केंद्राने कंपनीचा हा प्रस्ताव फेटाळला. मात्र सेकंड हँड फोन भारत मोठे मार्केट असल्याने तसा प्रयत्न ते पंतप्रधानांच्या भेटीत करण्याची शक्यता आहे.
अॅपलला स्वत:ची दुकाने आणि आॅनलाइन विक्री भारतात करायची आहे.
भारतात सेवा देण्यासाठी वितरण व सेवा-सुविधा नेटवर्क उभारायचे आहे.
अॅपलच्या फोनची निर्मिती करणाऱ्या फोक्सकॉनमार्फत ‘मेक इन इंडिया’अंतर्गत अंदाजे पाच अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीचा कंपनीचा विचार आहे.