कुख्यात अकीलने दिली होती एटीएसला धमकी

By admin | Published: November 1, 2016 02:43 AM2016-11-01T02:43:57+5:302016-11-01T02:43:57+5:30

अकील युसुफ खिलजी याने औरंगाबाद येथे एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) अधिकाऱ्यांना ‘जेलमधून बाहेर पडताच पाहून घेऊ’ अशी धमकी दिली होती.

ATS was threatened by notorious lawyers | कुख्यात अकीलने दिली होती एटीएसला धमकी

कुख्यात अकीलने दिली होती एटीएसला धमकी

Next


यवतमाळ : भोपाळ जेल ब्रेकनंतर एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेला अकील युसुफ खिलजी याने औरंगाबाद येथे एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) अधिकाऱ्यांना ‘जेलमधून बाहेर पडताच पाहून घेऊ’ अशी धमकी दिली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मध्य प्रदेशातील भोपाळचे कारागृह फोडून आणि एका कर्मचाऱ्याचा खून करून प्रतिबंधित सिमी संघटनेचे आठ कार्यकर्ते पळाले. मात्र पोलिसांनी सकाळी भोपाळपासून आठ ते दहा किलोमीटरवर त्यांचे एन्काऊंटर केले. त्यात आठजण मारले गेले. त्यात काही दिवसांपूर्वी औरंगाबाद व अकोला एटीएसने संयुक्तपणे अटक केलेल्या अकील युसुफ खिलजी (खंडवा, मध्य प्रदेश) याचाही समावेश आहे. तर मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दुल हकीम (खंडवा) हा सन २०१२ पासून एटीएसला वॉन्टेड होता. अकील सुमारे अडीच महिने एटीएसच्या ताब्यात होता. त्यावेळी त्याने एटीएसच्या औरंगाबाद कार्यालयात उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेलमधून सुटताच पाहून घेण्याची धमकी दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष असे, २००८ पासून फरार असलेला सलिक औरंगाबाद, बुलडाण्यातूनही पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. सोमवारी मात्र चकमकीत मारला गेला.
खंडव्यातही केले होते जेल ब्रेक
भोपाळपूर्वी मध्य प्रदेशातील खंडवा येथे ३० सप्टेंबर २०१३ ला जेल ब्रेक करण्यात आले होते. यात आठ जणांचा समावेश होता. यातील एक जण सोलापूरचा तर एक गुजरातचा आहे. त्या आठमधीलच दोघे रविवारी रात्री भोपाळ जेल ब्रेक करून पळून जात असताना सोमवारी सकाळी मध्य प्रदेश पोलिसांशी झालेल्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले. जेल ब्रेकनंतर यातील आरोपींनी खंडवा एटीएसचे पोलीस कर्मचारी सीताराम यादव यांचा खून केला होता, हे विशेष.
‘टीप’ अकीलची, सापडले होते दुसरेच
२६ मार्च २०१२ रोजी एटीएसला औरंगाबादमध्ये अकील खिलजी (भोपाळ जेल ब्रेकचा आरोपी) येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार दुपारी १ वाजता एटीएसचे पथक अकीलची माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता तेथे फायरिंग झाले. तेथे अकील आलाच नाही. मात्र त्याचा मुलगा खलील खिलजी, अबरार व इजहार कुरेशी हे तेथे आले होते. तेथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारीत इजहार कुरेशी मारला गेला. खलील हा सध्या नाशिक कारागृहात असल्याची माहिती आहे. तर अबरारला त्याचवेळी पकडण्यात आले होते. अबरार हा इंदोरचा असून अहमदाबादच्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. तो सध्या गुजरात कारागृहात असल्याचे सांगितले जाते. एटीएसने २७ मार्च २०१२ ला अकील खिलजी याला बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपासून २० किलोमीटर अंतरावर तर जफर हुसेन कुरेशी याला १२ किलोमीटर अंतरावर पकडले होते. जफर हा सध्या नागपूर कारागृहात आहे. त्यावेळी याच टोळीतील अन्वर खत्री यालाही पकडण्यात आले होते. तोही सध्या नागपूर कारागृहात आहे.
सलीकने दिला होता गुंगारा
भोपाळ जेल ब्रेकनंतर सोमवारी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला मोहम्मद सलीक हा त्यावेळी औरंगाबादमधून फरार होण्यात यशस्वी झाला होता. वास्तविक तो २००८ पासून एका खुनाच्या गुन्ह्यात अकील खिलजी याच्यासोबत फरार झाला होता. दरम्यान सलीकला त्याचे अन्य दोन साथीदार अमजद ऊर्फ ड्रायव्हर ऊर्फ पप्पू शेख रमजान (खंडवा) व जाकीर हुसेन उर्फ सादीक बद्रूल हुसेन (खंडवा) यांच्यासह १७ नोव्हेंबर २०१५ ला ओडिशामधील राऊरकेला येथे अटक करण्यात आली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी अकोला एटीएस, तेलंगणा, मध्य प्रदेश पोलीस प्रयत्नरत होते. मात्र मध्य प्रदेश पोलिसांना सर्वप्रथम त्यांचा ताबा देण्यात आला. कारण तेथे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. याच टोळीने खंडवा जेल ब्रेकनंतर १ फेब्रुवारी २०१४ ला तेलंगणा येथे बँकेत ४५ लाखांचा दरोडा टाकला होता. त्यामुळे तेलंगणा पोलीस त्यांच्या मागावर होते.
बॉम्ब बनविण्याचेही प्रशिक्षण
मध्य प्रदेशातील सिमी कार्यकर्त्यांच्या याच टोळीतील गुड्डू ऊर्फ शेख मेहबूब शेख इस्माईल हा आपल्या पाच साथीदारांसह उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे राहत होता. तेथे तो बॉम्ब बनवित असताना गंभीररीत्या भाजला होता. या घटनेनंतर तो साथीदारांसह तेथून फरार झाला.
अमरावती परिक्षेत्राला मिळाला होता अलर्ट
भोपाळ जेल ब्रेकनंतर अमरावती परिक्षेत्र पोलिसांना अलर्ट करण्यात आले होते. जेल ब्रेकमधील अनेक आरोपी अमरावती जिल्ह्यातील धारणीला लागून असलेल्या खंडवा येथील असल्याने ते मेळघाटच्या घनदाट जंगलात आश्रय घेण्याची शक्यता होती. त्यामुळेच अमरावती ग्रामीण, अकोला, बुलडाणा पोलिसांना अलर्ट करण्यात आले होते. सतर्कता म्हणून एटीएसची अकोला व अमरावती येथील टीम सकाळीच मेळघाटकडे रवानाही झाली होती.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: ATS was threatened by notorious lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.