अवकाळीचा पंढरपूर तालुक्यातील सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 05:00 PM2023-03-17T17:00:43+5:302023-03-17T17:00:51+5:30
दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच अवकाळी पावसाने मोठा दणका शेतकऱ्यांना दिला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने द्राक्षाचे भाव पडले आहेत. याबरोबरच निर्यात क्षम द्राक्षालाही देखील फटका बसला आहे.
दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी तीव्र उन्हामुळे आता द्राक्षाचे मणी फुटू लागले आहे. गतवर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष शेतात तोडून टाकण्याची वेळ आली होती. अशीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.