बाहुबली अहिंसा क्षेत्र करणार

By admin | Published: February 3, 2015 11:27 PM2015-02-03T23:27:21+5:302015-02-04T00:04:07+5:30

देवेंद्र फडणवीस : जगाला जैन तत्त्वज्ञानाची गरज; अहिंसा व विश्वशांतीचा संदेश देणारा महामस्तकाभिषेक सोहळा

Bahubali will do non-violence area | बाहुबली अहिंसा क्षेत्र करणार

बाहुबली अहिंसा क्षेत्र करणार

Next

भरत शास्त्री --बाहुबली --१००८ भगवान बाहुबलींनी अहिंसा, सत्य, त्याग व तपश्चर्येचा संदेश जगातील प्राणिमात्रांना दिला होता. देशाच्या विकासासाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक उन्नतीसाठी जैन तत्त्वज्ञानाची गरज भासत आहे. या तत्त्वज्ञानाची बिजे बाहुबली आश्रम आणि विद्यापीठात रुजवली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. हा सोहळा अहिंसा व विश्वशांतीचा संदेश देणारा महामहोत्सव आहे. बाहुबली परिसर अहिंसा क्षेत्र घोषित करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.बाहुबली (ता. हातकणंगले) येथे १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सहकारमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, सदाभाऊ खोत, समंतभद्र मंचावर १०८ वर्धमान सागरजी महाराज, क्षुल्लक समर्पणसागर महाराज, आर्यिका ज्ञानमती माताजी संघ व लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, बाहुबली संस्थेने संस्कारक्षम पिढी निर्माण केली आहे. १९३४ पासून या संस्थेने ज्ञानदानाचे काम अव्याहतपणे केले आहे. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या संस्कारामुळेच संपूर्ण महामस्तकाभिषेकातील अन्नदानाचा खर्च माजी विद्यार्थी करीत आहेत, ही बाब स्फुरणीय आहे. या भागातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी बाहुबली तीर्थक्षेत्राची संपूर्ण माहिती दिली. क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने बाहुबली व परिसरातील पाणीपुरवठा योजना, गुरुकुल वसतिगृहाची अद्ययावत इमारत, गुरुकुलातील मुलांसाठी भोजनगृह व परिसराला अहिंसाक्षेत्र घोषित करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.शेट्टी म्हणाले, बाहुबलीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा. देशभरातून लाखो भाविक येथे येतात. त्यामुळे या क्षेत्रास आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली. वीर सेवा दलाचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, सावकार मादनाईक, महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद दोशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, वाशिमचे आमदार राजेंद्र पटणी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डी. सी. पाटील, हातकणंगलेचे सभापती राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, बाबासाहेब पाटील, बापूसाहेब पाटील, डी. ए. पाटील, धनराज बाकलीवाल, भगवान काटे, अरुण पाटील, सनतकुमार आरवाडे, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्यासह भाविक उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांच्या घोषणा...
बाहुबली परिसरातील गावांना आवश्यक पाणीपुरवठा योजना, वसतिगृह, गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी भोजनगृह, बहुउद्देशीय सभागृह आदी मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही
शिवाजी विद्यापीठामधील महावीर अध्यासन केंद्रासाठी निधीची त्वरित पूर्तता करणार
बाहुबली परिसराला अहिंसा क्षेत्र घोषित करण्याबाबत आदेश काढणार
उपस्थितांची मने जिंकली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामस्तकाभिषेक सोहळ्यात भाषणाची सुरुवात दिगंबर मुनी व त्यागींना उद्देशून ‘नमोस्तू’ व श्रावक-श्राविकांना उद्देशून ‘जय जिनेंद्र’ म्हणून केली, तर भाषणाचा शेवट पुन्हा ‘जय जिनेंद्र’ म्हणून केला आणि उपस्थितांची मने जिंकली.


‘णमोकार’ मंत्राच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामस्तकाभिषेक
बाहुबली : श्री १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक समारंभाच्या दुसऱ्या दिवशीचा अभिषेक णमोकार मंत्राच्या जयघोषात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
भगवान बाहुबली मूर्ती सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पटणी (वाशिम), माजी मंत्री प्रकाश आवाडे, क्षुल्लकरत्न समर्पणसागर महाराज यांनी बाहुबली महामूर्तीवर मंगल कलशाभिषेक केला.
दुसऱ्या दिवशीचा भगवान बाहुबली मूर्ती चरणाभिषेक यजमान रवींद्र भरमू बेडगे, पुष्पा रवींद्र बेडगे यांच्या हस्ते झाला. प्रतिष्ठाचार्य पंडित सुशीलकुमार उपाध्ये, पं. महावीर शास्त्री, पंडित सम्मेद उपाध्ये यांनी मंत्रोच्चार विधीसह श्रुतस्कंध विधान केले. विधानमंडप ध्वजारोहण मुलचंद लुहाडिया यांनी केले. विधानमंडप उद्घाटन घीसूलालजी बाकलीवाल यांनी केले. मंगल कलशस्थापना उत्तमराव आवाडे, सपना आवाडे यांच्या हस्ते झाले. भरतेश सांगरुळकर यांनी दीपप्रज्वलन केले. दुसऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ्यातील जलाभिषेक यजमान रवींद्र बेडगे, यज्ञनायक प्रकाश नाईक यांच्या हस्ते झाला. दुग्धाभिषेक अजित छाबडा (जालना), आर. पी. पाटील (कुंभोज), वनौषधी अभिषेक प्रमोद लडगे (मुंबई), अष्टगंधाभिषेक तात्यासोा सिदनाळे (दत्तवाड) यांच्याहस्ते विविध १५ प्रकारच्या रसांनी भगवान बाहुबली महामूर्तीवर मस्तकाभिषेक झाला.
सायंकाळी रवींद्र जैन (मुंबई) यांचा संगीत सरगम कार्यक्रम झाला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, महावीर शंकर गाठ, अरविंद दोशी, बाबासाहेब पाटील, धनराज बाकलीवाल, बी. टी. बेडगे, कार्याध्यक्ष डी. सी. पाटील, तात्यासो अथणे, प्रकाश पाटील, अनिल भोकरे, कलगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Bahubali will do non-violence area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.