‘पर्यावरणाच्या संतुलनाकडे लक्ष हवे’

By Admin | Published: June 5, 2017 02:14 AM2017-06-05T02:14:53+5:302017-06-05T02:14:53+5:30

दिवसागणिक पर्यावरणाची बेसुमार हानी होत आहे. दुर्दैवाने त्याकडे नेमके कोणी लक्ष द्यायचे,

'Balance the ecological balance' | ‘पर्यावरणाच्या संतुलनाकडे लक्ष हवे’

‘पर्यावरणाच्या संतुलनाकडे लक्ष हवे’

googlenewsNext

दिवसागणिक पर्यावरणाची बेसुमार हानी होत आहे. दुर्दैवाने त्याकडे नेमके कोणी लक्ष द्यायचे, हा प्रश्न विचारला जातो. वास्तविक पर्यावरणाचे जतन ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. संवेदनशीलपणे पर्यावरणाकडे पाहिल्यास, वेगवेगळ्या प्रकारे होणारे पर्यावरणाचे नुकसान दिसून येते. विकासाच्या नावाखाली हे नुकसान होत आहे. मात्र निसर्गाची हानी रोखल्यास बऱ्याच प्रमाणात पर्यावरणाचे जतन होऊ शकेल, अशी अपेक्षा अनेक पर्यावरणप्रेमींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
पर्यावरणाचे महत्त्व ओळखून पर्यावरणस्नेही जीवनशैली जगली पाहिजे. वापर आणि पुनर्वापर हे तत्त्व अंगीकारले पाहिजे. भरपूर झाडे लावली पाहिजेत. पर्यावरण वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात कीटकनाशकांचा वापर कमी करावा. इकोफ्रेंडली जीवनशैली जगली पाहिजे. नॅशनल पार्कमधील वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनामध्ये वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन केले जाते. सध्या पर्यटनामध्ये नवीन उपक्रम सुरू आहेत. नॅशनल पार्कमध्ये रस्ते आणि पूल आहेत; त्यांची सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चांगले बांधकाम केले जाणार आहे. पर्यावरणाच्या संतुलनाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. वाढते तापमान, कमी किंवा अति पाऊस आणि दुष्काळ अशा समस्या आहेत. त्यावर एक पर्यायी मार्ग आहे पर्यावरणाचे संतुलन राखणे.
- पी.बी. भालेकर, विभागीय वनअधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली
झाडे, उद्याने, पर्यावरणाचे गांभीर्य मुंबईकरांना नाही. मुंबईचा विकास होताना पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण सवंर्धनासाठी मुंबईकरांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विकासासाठी पर्यावरणाचे नुकसान करणे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने विकासासोबत पर्यावरण कसे जोपासता येईल याचाही विचार करावा.
- डी. स्टॅलिन,
प्रकल्प संचालक, वनशक्ती
हवामान संतुलित राखायचे असेल तर त्यात झाडे महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यासाठी झाडे लावणे आणि ती जोपासणे महत्त्वाचे आहे. झाडांची संख्या खूपच कमी असल्याने ती संख्या वाढवणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी शहरात होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करायला हवा. मुंबईत पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे; त्यापासून मुंबईला वाचविणे गरजेचे आहे. एका नागरिकाच्या विरोध करण्याने सरकार आपले निर्णय बदलत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षतोडीला विरोध करायला हवा.
पर्यावरण वाचविणे हे फक्त प्रशासनाचे काम नसून सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.
- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन
जंगल आपल्या हातात नाही आहे, ते स्वत:ची काळजी स्वत: घेते. विकास करताना नियोजन केले पाहिजे. तरुण पिढीने पुढाकार घेतला पाहिजे. तरुणांनी प्रत्येक वेगवेगळ्या शाखेत जात पर्यावरणाचा अभ्यास केला पाहिजे. आरेच्या जंगलालादेखील पर्यायी उपाय सुचवले गेले पाहिजेत. पर्यावरण वाचविण्यासाठी वैयक्तिक स्तरावर कार्यवाही केली पाहिजे. नॅशनल पार्क ही एक आगळीवेगळी जागा आहे. तिला आपण जपले पाहिजे.
- निकित सुर्वे, वन्यजीव संशोधक
कचरा नदीत फेकता कामा नये. महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा टाकला पाहिजे. नदीकाठावर राहणाऱ्या लोकांनी स्वच्छता जोपासली पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे. प्लॅस्टिकव्यतिरिक्त इतर पर्यायी वस्तूंचा वापर केला पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. सोसायटीमधील जागेत झाडे लावली पाहिजेत. नद्यांचे काँक्रिटायझेशन थांबविले पाहिजे.
- सागर वीरा, स्वयंसेवक,
रिव्हर मार्च
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा मुंबईकरांना मोठा फटका बसत आहे. चमत्कारिकरीत्या मुंबई शहराची प्रगती जागतिक तापमानवाढीच्या दिशेने होत आहे. शहरात सर्वत्र काँक्रिटीकरण झाले आहे. शहरात पाणथळ जागा, हिरवळ असलेल्या जागा, मोकळ्या जागा शिल्लक राहिल्या नाहीत. तापमान संतुलित राखणाऱ्या यंत्रणेची वाढ होण्याऐवजी आश्चर्यकारकरीत्या त्यांचा ऱ्हास होऊ लागला आहे. तापमानवाढीस, हवामान बदलास पूरक असलेल्या घटकांची वाढ होत आहे. पावसाचे चक्र, उन्हाळ्याचा अनियमितपणा याचा इतर घटकांवर परिणाम होत आहे. यामुळे झाडे सुकत आहेत. नवी झाडे लावली जात नाहीत. विकासाच्या नावाखाली ज्या काही अनावश्यक गोष्टी होत आहेत त्या थांबविण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न करायला हवेत. विचार आणि चर्चा न करता कृती करायला हवी.
- अविनाश कुबल, उपसंचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहीम

Web Title: 'Balance the ecological balance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.