‘सिजेंटा’च्या सर्वच वाणांना महाराष्ट्रात बंदी घालावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2016 02:02 AM2016-05-17T02:02:54+5:302016-05-17T02:02:54+5:30
सिजेंटा टोमॅटो १०५७ या वाणामुळे तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव होऊन टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान झाले
पुणे : सिजेंटा टोमॅटो १०५७ या वाणामुळे तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव होऊन टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे ‘सिजेंटा’ कंपनीच्या सर्वच वाणांना महाराष्ट्रात बंदी घालावी, असा ठराव सोमवारी पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, हवेली, दौंड, बारामती, शिरूर तालुक्यातील टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. त्यासाठी शासनाने पुढकार घ्यावा, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली, तर दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे नुकसानभरपाई न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी दिला.
कृषी विभागातर्फे सादर करण्यात आलेला अहवाल हा केवळ कंपनीच्या बाजूचा असून, शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा नाही. या अहवालात हवामानाचा परिणाम, तापमान वाढले, किडींचा प्रादुर्भाव अशा प्रकारचे तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले असल्याचे आशा बुचके यांनी बैैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)