बडोदा ते मुंबई एक्स्प्रेस-वेचा १ जानेवारीला शुभारंभ

By admin | Published: September 18, 2016 03:13 AM2016-09-18T03:13:51+5:302016-09-18T03:13:51+5:30

येत्या १ जानेवारीला बडोदा ते मुंबई या ३२५ कि.मी.च्या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली

Baroda to Mumbai Express-Vega Launched on 1st January | बडोदा ते मुंबई एक्स्प्रेस-वेचा १ जानेवारीला शुभारंभ

बडोदा ते मुंबई एक्स्प्रेस-वेचा १ जानेवारीला शुभारंभ

Next


येत्या १ जानेवारीला बडोदा ते मुंबई या ३२५ कि.मी.च्या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची घोषणा मार्ग परिवहन आणि महामार्ग, जहाजबांधणी आणि सागरी वाहतूक खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या एक्स्प्रेस-वेमुळे अहमदाबाद आणि मुंबई ही शहरे जोडली जाणार असून, भविष्यात याचे खूप फायदे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्ते जोडणी प्रकल्पांची माहिती गडकरी यांनी या वेळी दिली. बडोदा-मुंबई या एक्स्प्रेस-वेसाठी ४२ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नागपूर ते रत्नागिरी हा १२ हजार कोटींचा एक्स्प्रेस-वेदेखील तयार करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग मागील कित्येक वर्षे रखडला असून, केवळ जमीन संपादित करणे आणि येथील अतिक्रमण हटविण्यासाठी फारच त्रास सहन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आता हा रस्तादेखील पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, ४ फेजमध्ये या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. दोन फेजच्या निविदा काढण्यात आल्या असून, त्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यानुसार येत्या ४ महिन्यांत १२ हजार कोटींचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे येत्या २०१८पर्यंत किंवा त्याआधीच मुंबई - गोवा महामार्ग हा चार लेनचा तोही सिमेंट काँक्रिटचा तयार करून तो कोकणवासीयांच्या सेवेसाठी दिला जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. याशिवाय पुणे ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर येथेही चार लेनचे महामार्ग प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी १० हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे येथे पालखी मार्ग तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी एकाच वेळेस १० हजार लोकांना बसता येईल यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भक्तांसाठी आरामाची सुविधा, टॉयलेट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात ५२०० कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग असून, आता २२ हजार कि.मी.पर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या रस्त्यांच्या कामांसाठी अंदाजे २ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु महाराष्ट्रात आणखीनही रस्ते विकासाची कामे करायची असल्याने हा खर्च २५०० लाख कोटी ते ३ लाख कोटींपर्यंतही जाऊ शकतो. परंतु आम्हाला पैशांची चिंता नाही. सरकारकडे खूप पैसे आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी केवळ व्हिजन महत्त्वाचे असून, त्यासाठी राजकीय पाठबळ आणि मानसिकतादेखील खूप महत्त्वाची असते, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही ई-गव्हर्नन्सची संकल्पना अंमलात आणली असून, आमच्या विभागाने आतापर्यंत साडेतीन लाख कोटींची कामे दिली आहेत, परंतु यासाठी एकाही कंत्राटदाराला दिल्लीत येण्याची गरज पडलेली नाही. मी माझ्या विभागातील अधिकाऱ्यांना सांंगून ठेवले आहे की, टॉयलेट पेपरची जरी गरज पडली तरी त्यासाठी टेंडर काढा, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. यापूर्वी रखडलेल्या ४०३ प्रकल्पांपैकी ३ लाख ८५ हजार रुपये खर्चाचे ९५ टक्के प्रकल्प माझ्या कारकिर्दीत मार्गी लावले आहेत. काम करताना अडचणी येतात, परंतु एखादे काम लवकर झाले तर कसे झाले, उशिरा झाले तर उशिरा का झाले, अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे जसा कमी वेळात पूर्ण झाला तसाच दिल्लीत आता एका बायपास रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार होता. परंतु पंतप्रधानांनी हे काम लवकर होऊ शकते असे सांगितले, त्यानुसार आता हे काम ४०० दिवसांत पूर्ण करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. त्यानुसार ४०० दिवसांत १५ हजार कोटींचे काम आम्ही पूर्ण करून दाखवू, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे पोर्टचा विकास करण्याचेही काम हाती घेतले आहे. गुजरात, गुडगावपेक्षाही आपल्या पोर्टचे काम हे वेगाने सुरू असून, त्यामुळे ६ हजार कोटींचा फायदा आपल्याला मिळाला आहे. तसेच ६ नवीन पोर्ट उभारण्याचे काम सुरू झाले असून, यासाठी पनवेल ते जेएनपीटीपर्यंत आठ लेनचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच जेएनपीटीलादेखील सवलती देण्यात येत असून, त्यानुसार ८० हजार कोटींचे काम सुरू आहे. इनलेड वॉटर वेस्टवरही आपले आता काम सुरू असून रोड, रेल्वेपेक्षाही इनलेड वॉटरचा प्रवास हा केवळ २० पैशांत होणार आहे. सागरमालासाठीदेखील ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून, यामध्ये १ लाख कोटींचे रेल्वे रोड आणि एक लाख कोटींचे मॉडेल नॅशनल रोड आणि उर्वरित दोन लाख कोटींचे ग्रामीण रस्ते यामध्ये समाविष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईची अवस्था ही फार वाईट आहे, परंतु ही परिस्थिती बदलायची असून, मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठीदेखील विविध स्वरूपाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. टेक्नॉलॉजी प्रगत होत असल्याने त्याचा फायदादेखील होत असून, आता प्लास्टीकचा पुनर्वापर करण्याचे काम सुरू आहे. एकूणच महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास असून, केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी भरपूर निधी देण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली.
>वॉटर ट्रान्सपोर्टवर भर देण्याचे काम आता सुरू असून, जेट्टीसाठीदेखील आम्ही पैसे देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला ७५०० किमीचा समुद्रकिनारा लाभला असून, २० हजार किमीचा नदीकिनारा लाभला आहे. आपल्याला २ हजार वॉटर पोर्ट तयार करायचे आहेत, गंगेमध्ये ५० वॉटर पोर्ट तयार करण्याचे काम सुरू असून, वाराणसीत कामाला वेग आला आहे. मला महाराष्ट्रातदेखील वॉटर पोर्ट तयार करायचे आहेत. परंतु यासाठी सहकार्य खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजस्थानमध्ये एक असा हायवे तयार करण्याचे काम सुरू आहे की तेथे विमान उतरल्यावर तेथील वाहतूक थांबली जाणार असून, विमान उडाल्यानंतर तेथील वाहतूक पुन्हा सुरू होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एअरपोर्टची संख्या वाढवायची असून, पाण्यावरून एअरशिप सुरू करायची आहे. भविष्यात रेल्वे, बसपेक्षा विमान प्रवास स्वस्त होईल, असे काहीतरी करायचे असून विमान प्रवासासाठी रांगा लागल्याचे बघायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Baroda to Mumbai Express-Vega Launched on 1st January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.