बालभारतीकडून पुस्तक वितरणास सुरुवात
By admin | Published: May 17, 2016 01:53 AM2016-05-17T01:53:00+5:302016-05-17T01:53:00+5:30
बालभारतीकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली
पुणे : बालभारतीकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. यंदा इयत्ता सहावीची नवीन पुस्तके छापली असून, मराठी माध्यमाची सहावीची सर्व पुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अनुदानित शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या वितरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पुस्तक छपाईचे काम बालभारतीकडे सोपविले आहे. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून मोफत पुस्तकांचे वितरण केले जाते. दर वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, या उद्देशाने आवश्यक नियोजन केले जाते. तसेच, काही पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिले जातात. विक्रीसाठीची पुस्तके व सर्व शिक्षा अभियानांतर्गत वितरित केली जाणारी पुस्तके वेगवेगळी ठेवली जातात. यंदा सहावीच्या नवीन पुस्तकाची छपाई करण्यात आली असून ही पुस्तक बाजारात दाखल झाली आहेत.
सुनील मगर म्हणाले, ‘‘पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व गोरेगाव हे बालभारतीचे आठ विभाग आहेत. या विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुस्तकांचे वितरण केले जाते. जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये पुस्तकाचे वितरण होते. गुरुवारपासून (दि. १२) पुस्तकांच्या वितरणास सुरुवात झाली. बालभारतीमधील सुमारे २० टक्के पुस्तकांचे वितरण झाले आहे.