Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:51 IST2022-11-07T11:49:34+5:302022-11-07T11:51:17+5:30
Maharashtra News: वरळी, ठाणे पालघर, बोईसर आणि डहाणू येथील हजारो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण!
Maharashtra Politics:एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला प्रचंड मोठे खिंडार पडले. राज्यभरातून शिवसैनिकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. केवळ शिवसेना नाही, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाल्याचे चित्र आहे. यातच आता शिंदे गटाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील शेकडो पदाधिकारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा झटका दिला. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत
शिंदे-फडणवीस सरकारकडे आमदारांचे बहुमत आहे. एक मजबूत सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेतोय. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाही. काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असाच ओघ राहिला तर समोर राहणार काय? त्यामुळे नवीन बातम्या पसरवल्या जात आहेत. मध्यावधी निवडणुका लागतील असे बोलत आहेत. तुमचे लॉजिक काय, अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केली.
आपण एका विश्वासाने आला आहात, त्याला कुठेही तडा जाणार नाही
आपण एका विश्वासाने आलेला आहात. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. हे सरकार तुमचे, आमचे सगळ्याचे आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे, अशी ग्वाही देत, काही जणांना पोटशूळ उठलेले आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढे काम करत आहे, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहिले तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झाली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"