Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही”; भाजप नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:55 PM2022-09-07T22:55:04+5:302022-09-07T22:56:22+5:30

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असा विश्वासही भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.

bjp chandrashekhar bawankule claims that maha vikas aghadi could not form govt again in the state | Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही”; भाजप नेत्याचा मोठा दावा

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: एकीकडे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, दुसरीकडे राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साथीने शिवसेनेसह महाविकास आघाडीला चितपट करण्यासाठी भाजपने प्लान आखण्यास सुरुवात केली असून, महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. 

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मीडियाशी बोलताना सदर दावा केला आहे. उद्धव ठाकरे नैराश्यात बोलत आहेत. त्यांचे मुख्यमंत्री पद गेले आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री पद काढून टाकले आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. मुंबईत आमचा महापौर असणार, पुण्यात आमचा महापौर असणार. महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार. कुठलीही निवडणूक येऊ द्या, नंबर एकचा पक्ष आमचाच असणार, असा दावा बावनकुळे यांनी केला. 

महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही

महाराष्ट्रातील दोनशेच्यावर आमदार आम्ही निवडून आणणार. महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही. महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असाही दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान मोदीजींचे कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठे आहे. त्यांना १५० देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत, असा एल्गार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते मीडियाशी बोलत होते.

मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखे वाटते

पंतप्रधान मोदीजींना सहपरिवार भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला २२ मिनिटे वेळ देत माझ्यासोबत आपुलकीने संवाद साधला. ती माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखे वाटते. हे मी अनुभवले आहे. भाजपच्या नेतृत्वाने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवण्याचे काम केले. पक्षाच्या त्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. पक्षाचा आभारी आहे. माझ्यावर सगळ्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी पार पडणार, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. नितीश कुमार यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीची कृपा आहे. नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडे उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. तिकडे त्यांनी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: bjp chandrashekhar bawankule claims that maha vikas aghadi could not form govt again in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.