Lakshadweep: “सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 14:29 IST2021-05-29T14:23:45+5:302021-05-29T14:29:16+5:30
Lakshadweep: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Lakshadweep: “सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार आणि विरोधक यांच्या अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. विषय राज्यातील असो वा केंद्रातील राजकारण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. लक्षद्वीपमध्ये गोमांस बंदीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका, या शब्दांत भाजपने पलटवार केला आहे. (bjp keshav upadhye replied shiv sena and sanjay raut over lakshadweep beef ban issue)
लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या एका निर्णयांमुळे स्थानिक पातळीवर बेरोजगारीसह अन्य समस्या तयार होत असून, असंतोष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला प्रश्न विचारत टीका केली. याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लक्षद्वीपवर गोमांसाला बंदीचा विषय आला @PawarSpeaks नतंर आता इकडे शिवसेनेचा जीव कळवळला आणि @SaamanaOnline अग्रलेखातून बोंब केली.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 29, 2021
आम्ही अजूनही #हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका.
शरद पवारांनंतर आता शिवसेनेचा जीव कळवळला
अजानस्पर्धा व जनाब बाळासाहेब ठाकरे पाहिल्यानंतर आता सामनामध्ये गोहत्या समर्थन पाहून महात्मा फुलेंचे उद्गार नव्या संदर्भात आठवले असल्याचं सांगत, “सत्तेसाठी मती गेली, मतीविना हिंदुत्वाचा विचार गेला विचाराविना तत्व गेली, तत्वविना आचार गेले आचाराविना सगळेच गेले..इतके अनर्थ एका सत्तेने केले.., असा टोला लगावत लक्षद्वीपवर गोमांसाला बंदीचा विषय आला शरद पवारांनंतर आता इकडे शिवसेनेचा जीव कळवळला आणि सामानाच्या अग्रलेखातून बोंब केली. आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका, अशी टीका केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून केली आहे.
“केंद्र सरकार कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचा कृत्रिम तुटवडा निर्माण करतंय”
मोठ्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो
आपण जो काही निर्णय घेणार आहोत, तो विचारपूर्वक आणि स्थानिकांना विचारात घेऊनच घेतला पाहिजे. तिथे अस्वस्थता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम आख्ख्या देशाला भोगावा लागतो. कायदा सगळ्यांना समान असायला हवा. लक्षद्वीपमध्ये बीफबंदीचा कायदा तुम्ही आणला. पण इतर भाजपाशासित राज्यांमध्ये तशी बंदी नाही. मग फक्त लक्षद्वीपमध्येच असा कायदा लागू झाला, तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. त्यामुळे राजकीय नेते किंवा प्रशासकीय अधिकारी, या सगळ्यांनीच विचारपूर्वक पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या दिवसांमध्ये मोठ्या असंतोषाचा सामना करावा लागू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले
नेमके प्रकरण काय आहे?
लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या एका निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. लक्षद्वीपमध्ये ९० टक्के जनता ही मुस्लिम आहे. दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना ग्राम पंचायत निवडणुकीत अपात्र ठरवण्याचा आणि गोमांसांवर बंदी घालण्याची प्रस्ताव मांडल्याने केंद्रशासित प्रदेशात खळबळ उडाली आहे. केंद्र शासित प्रदेश असणाऱ्या लक्षद्वीप येथे पाच महिन्यापूर्वी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. नरेंद्र मोदी गुजराते मुख्यमंत्री असताना पटेल हे त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहत होते.