“बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 09:51 AM2023-01-15T09:51:05+5:302023-01-15T09:52:02+5:30
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
![bjp leader minister narayan rane targets shiv sena uddhav thackeray matoshree balasaheb thackeray | “बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन” bjp leader minister narayan rane targets shiv sena uddhav thackeray matoshree balasaheb thackeray | “बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/narayan-rane-uddhav-new_202301945620.jpeg)
“बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”
“शिवसेनेची काय अवस्था झालीये. ४० आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेंसोबत जातात आणि शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहतात. उद्धव ठाकरे रडले की हे रडतात. रडणारी शिवसेना कधीच नव्हती, लढणारी शिवसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही सांगायचो. आता कुठे आहे सळसळतं रक्त,” असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“हे दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही नाही का घेतले खोके? आम्ही काय मातोश्रीवर गुच्छ घेऊन जायचो का मातोश्रीवर? उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी आम्ही काय काय आणि कोणत्या कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे सांगेन. आम्हाला बोलायला लावू नका, वयाच्या १५ व्या वर्षापासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांसाठी आम्ही वेडे होतो. त्यांनी प्रेमही दिलं आणि विश्वासही दिला. त्यामुळे आम्ही त्यागाला तयार होतो. जीवाची पर्वा केली नाही. संपादकाचाही पगार घ्यायचा आणि नेता म्हणूनही तोडबाजी करायची असं नाही,” असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.
“शिवसेनेसाठी शिवसैनिकांचा त्याग आहे आणि आयत्या बिळावर उद्धव ठाकरे अडीच वर्ष बसले. सिंधुदुर्ग रत्नागिरीबद्दल सांगायचं तर काय केलं? मी पालकमंत्री होतो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावणे दोनशे कोटी रुपये दिले. यांनी सव्वाशे कोटींवर दिले नाहीत आणि तेही खर्च केले नाहीत. कोकणासाठी काय केलं?” असा सवालही त्यांनी केला.