CM फडणवीसांची गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याची इच्छा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:52 IST2024-12-27T12:52:02+5:302024-12-27T12:52:11+5:30
Chandrashekhar Bawankule News: महायुतीतील नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत असून, अनेक जिल्ह्यातील पालकमंत्रीपद प्रतिष्ठेचे बनल्याचे सांगितले जात आहे.

CM फडणवीसांची गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याची इच्छा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Chandrashekhar Bawankule News: पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला पाठवले तरी मी बीडला जाईन. पण माझ्या मते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणते पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. असे असले तरी माझी इच्छा अशी आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल. अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मन की बात बोलून दाखवली होती. याबाबत आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या भरघोस यशानंतर एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपासह आकाराला आले. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेवाटपासाठी मंत्र्यांना ७ दिवस वाट बघावी लागली. आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना प्रतीक्षा आहे ती पालकमंत्रिपदाच्या वाटपाची. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे
गडचिरोलीमधून अशी मागणी आहे की, जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे. जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, तेव्हा तिथल्या विकासाला गती मिळते. गडचिरोलीमधून तशी मागणी होत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंत्रीपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. ३६ पैकी ११ जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याचे महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.