वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Published: July 12, 2017 01:40 AM2017-07-12T01:40:38+5:302017-07-12T01:40:38+5:30

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

Changes in the environment are dangerous | वातावरणातील बदल ठरताहेत घातक

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. सध्या शहरात पहाटे गारवा, दुपारी कडक उन्हाचे तापमान व सायंकाळी खेळणारी थंड हवा़ त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
४३ डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले की ढगाळ वातावरण, गारपीटसदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात अचानक बदल घडत आहेत. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असाच सध्याच्या वातावरणाचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उपनगर भागासह शहरातदेखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.
झालेल्या बदलामुळे काय काळजी घ्यावी?
पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करून प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साखरेचे प्रमाण किती असते, याची माहिती घ्या. पण शक्यतो असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य.
उघड्यावरील खाद्य पदार्थ ठरताहेत धोकादायक
जाधववाडी : जाधववाडी व कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जातात. या खाद्यपदार्थांवर आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात माशा उघड्या खाद्यपदार्थांवर बसतात. उघडे खाद्यपदार्थ हातगाडी व हॉटेलमध्ये विकले जातात. हे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक व पोटाकरिता अपायकारक असून, नागरिक उघड्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.
वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र, पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरुवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो.
-डॉॅ़ शैलजा भावसार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पिंं. चि. मनपा
या दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
- डॉॅ़ बबन ठोंंबरे, जनरल फिजिशिएशन.
माशांपासून मुक्तता मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना विक्रेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत. पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, घाणीवरील माशा उघड्या पदार्थांवर बसल्याने विषाणूंचा प्रवेश सहजरीत्या होतो, तसेच अतिप्रमाणात हे पदार्थ खाण्यात आल्यावर इन्फेक्शन होऊन जुलाब ,उलट्या होऊ शकतात परिणामी तापही येतो
- डॉ. जयसिंग जाधव, जाधववाडी

Web Title: Changes in the environment are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.