शहर, उपनगरांत त्रेधातिरपीट

By Admin | Published: August 6, 2016 05:17 AM2016-08-06T05:17:39+5:302016-08-06T05:17:39+5:30

शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी धावत्या मुंबईला ब्रेक लावला.

City, in the suburbs | शहर, उपनगरांत त्रेधातिरपीट

शहर, उपनगरांत त्रेधातिरपीट

googlenewsNext


मुंबई : शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी धावत्या मुंबईला ब्रेक लावला. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर पावसाचा विपरीत परिणाम झाल्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. सायंकाळपर्यंत शहरात ८१.७१ मिलीमीटर, पूर्व उपनगरांत ९२.०३ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरांत ७९.४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ६ ठिकाणी घरांच्या भिंतींचा भाग पडला.
५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. २६ ठिकाणी झाडे पडली. ठिकठिकाणच्या सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे उपनगरांतील काही परिसरांत ‘पूरसदृश’ स्थिती निर्माण झाली होती.
दुपारी २ वाजता समुद्राला भरती आली. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. परिणामी, शहरात मुलजी राठोड चौक, सायन रोड क्रमांक २४, समाज मंदिर हॉल, प्रतीक्षा नगर, हिंदमाता, किंग्जसर्कल, महालक्ष्मी, भायखळा पूर्व, दादर, गांधी मार्केट, पूर्व उपनगरांत घाटकोपर पूर्व, कुर्ला येथील शीतल सिग्नल, कमानी जंक्शन, ख्रिश्चन गाव, विद्याविहार पश्चिमेकडील स्टेशन रोड, चुनाभट्टी, पश्चिम उपनगरांत वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी, सांताक्रुझ पूर्व, खार या परिसरांतील सखल भागांत पाणी साचले. पाण्याचा त्वरित निचरा व्हावा म्हणून मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली. शिवाय महापालिकेचे कामगार, कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले.
पावसाचा मारा सुरूअसतानाच शहरात २, पूर्व उपनगरांत २ आणि पश्चिम उपनगरांत २ अशा एकूण ६ ठिकाणी घरांच्या भिंतींचा भाग पडला. पश्चिम उपनगरांत खार येथील आनंद विहार या खासगी इमारतीच्या चौथ्या मजल्यासह पाण्याच्या टाकीचा भाग पडला. ही इमारत धोकादायक असल्यामुळे यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती. गोवंडी, बैंगणवाडीत घराचा भाग कोसळून सहा जण जखमी झाले. त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गोवंडी येथील शिवाजीनगरलगतच्या नाल्यात एक मुलगा वाहून गेला.
वरळीतल्या पोचखानवाला रोड येथील तटरक्षक दलाच्या कार्यालयाजवळ दरडीचा काही भाग कोसळला. शहरात १, पूर्व उपनगरांत २ आणि पश्चिम उपनगरांत २ अशा एकूण ५ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात ११, पूर्व उपनगरांत ३ आणि पश्चिम उपनगरांत १२ अशा एकूण २६ ठिकाणी झाडे कोसळली.
>अनेकांनी टाळला प्रवास : जोरदार पावसामुळे उपनगरांतील वाहतूक कोलमडली असताना, शहरात मात्र वाहतूक सुरळीत होती. महत्त्वाच्या जंक्शनवर वाहतूक पोलीस दिसत होते. शिवाय सततच्या पावसामुळे बहुतेक नागरिकांनी प्रवास टाळल्याचे चित्र दिसले.
>पालिका कर्मचारी ‘आॅन स्पॉट’ : मुंबई शहरात ठिकठिकाणी पालिका कर्मचारी पाण्याचा निचरा होईल, याची पाहणी करत होते. काही ठिकाणी पंप लावले होते, तर काही ठिकाणी गटाराची झाकणे उघडून पालिका कर्मचारी नागरिकांना सावधानतेचे आवाहन करत होते. त्यामुळे नेहमी पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवर यंदा मात्र पाण्याचा योग्य निचरा झाल्याचे दिसले.
>रस्त्यांची चाळण : सततच्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दैना उडाली आहे. काही दिवसांपूर्वी बुजविलेले खड्डे शुक्रवारी झालेल्या पावसानंतर पुन्हा उघडे पडले आहेत. बहुतेक मुख्य रस्त्यांवर तर खड्ड्यांमधील खडी पसरली होती. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येत होते.
>मुसळधार पावसाचा इशारा
वायव्य बंगालच्या उपसागरासह ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता ओडिशात कायम राहत झारखंडवरही आले आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण गुजरात ते दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सरकले आहे. वातावरणातील या बदलामुळे येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गोव्यात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वातावरणातील बदलामुळे ६ आॅगस्ट रोजी दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
७ आॅगस्ट रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. येत्या ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल.
>पावसाने झोडपले
शुक्रवारी पहाटे रिमझिम सुरू झालेल्या पावसाने सकाळी साडेआठनंतर वेग घेतला आणि दुपारी दोन वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने फोर्ट, कुलाबा, नरिमन पॉइंट, गिरगाव, भायखळा, लालबाग, दादर, परळ, माटुंगा, ग्रँटरोड, महालक्ष्मी, वरळी, प्रभादेवी, माहीम, वांद्रे, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली, कांदिवली व गोरेगाव या परिसरांना अक्षरश: झोडपून काढले.
>गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढला
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहरासह उपनगरांत विश्रांती घेतली होती. गुरुवारी दुपारी पडलेल्या उन्हामुळे मुंबईतील उकाड्यात वाढ झाली होती, मात्र मध्यरात्रीपासून तुरळक ठिकाणी सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी पहाटे जोर पकडला.
>पाणी साचलेल्या परिसरांची पाहणी
महापौर स्नेहल आंबेकर यांनी सकाळपासून पाणी तुंबलेल्या ठिकाणांची पाहणी केली. पालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सीसीटीव्हीद्वारे, शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
>वाहतूक कोंडी
बोरीवलीप्रमाणेच वांद्रे पूर्व माहीम कॉजवे पाण्याखाली गेला. अंधेरी, चकाला मेट्रो स्थानक आणि विमानतळ मार्गावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूककोंडी झाली. सांताक्रुझ येथेही वाहतूककोंडी झाली. कांदिवली ते अंधेरी येथेही वाहतूककोंडी झाली. रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. पावसामुळे मालाडच्या तानाजीनगर, शिवाजीनगर आणि क्रांतीनगरमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले.
>येथे पडला सर्वाधिक पाऊस (मिमी)
वडाळा १०२.६२
वरळी १२२.६९
अंधेरी १११.५
वांद्रे १६२.८२
मरोळ १०७.१८
विलेपार्ले १०४.१४
कुर्ला १३४.३६
देवनार १०७.९४
विक्रोळी ११०.७२

Web Title: City, in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.