मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:56 IST2025-02-23T10:55:43+5:302025-02-23T10:56:19+5:30
जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?
ठाणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपा एक्टिव्ह मोडवर आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराने महायुतीत भाजपा आणि शिवसेनेत कुरघोडी सुरू आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यातच जनता दरबाराच्या आधी भाजपा नेत्यांनी ठाण्यात आढावा बैठक घेतली. त्याशिवाय पक्ष संघटना मजबूत करणे त्यात चुकीचे काही नाही असं विधान माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. जनतेत जाऊन लोकांची कामे करा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यानुसार ठाण्यात जनता दरबार भरवला जातोय असंही त्यांनी नमूद केले. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा भाजपा प्रयत्न करतंय का असा सवाल उपस्थित होत आहे.
माजी खासदार संजीव नाईक म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्यात चुकीचे काही नाही. पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना ताकद देणे हे प्रत्येक पक्षाने केले पाहिजे त्यातच लोकशाहीची ताकद आहे. जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे ठाण्यात आले होते तेव्हा त्यांनीही महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे हे म्हटलं होते. युती करायची की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. जे वरिष्ठ ठरवतील ते आम्हाला मान्य राहील असं त्यांनी सांगितले.
तसेच जनता दरबाराला विरोध करण्याचा प्रश्न आहे. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मंत्रालयात काम घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता, मंत्रीच जनतेपर्यंत पोहचत आहेत. ठाणे जिल्हा खूप मोठा आहे. कुठेही गैरसमज होत असतील तर ते वरिष्ठ पातळीवर दूर करण्यात येतील. आमच्या जिल्ह्यातील तिन्ही मंत्री जोमाने लोकांचं काम करतील. जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला.
दरम्यान, मंत्र्यांनी जितके जनतेत मिसळून काम करतील, जनतेशी संवाद साधतील त्यातून आपण जनतेला दिलेली वचने आहेत त्याची पूर्तता होईल. लोकांमध्ये जाऊन काम करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. त्यानुसार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक हे लोकांमध्ये जाऊन काम करतायेत. त्यासाठी ठाण्यात आम्ही आढावा बैठक घेतली. विविध खात्याचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी मिळून जनता दरबारात लोकांचे प्रश्न कसे सोडवले जातील. त्यांचे अर्ज घ्यायचे आणि संबंधित खात्यापर्यंत कसे पोहचतील याबाबत भाजपाकडून आढावा बैठक घेण्यात आली अशी माहिती संजीव नाईक यांनी दिली.