आयुक्त-महापौरांत पाण्यावरून मतभेद
By admin | Published: May 17, 2016 01:52 AM2016-05-17T01:52:06+5:302016-05-17T01:52:06+5:30
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत पुणेकरांना माणशी ३०० लिटर पाणी दिले जाते असे सांगितले
पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत पुणेकरांना माणशी ३०० लिटर पाणी दिले जाते असे सांगितले, ते अत्यंत चुकीचे असल्याची टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली. आयुक्तांनी कोणत्या अहवालाच्या आधारे ही माहिती दिली त्याची चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. आयुक्तांच्या या वक्तव्यामुळे केंद्र सरकारकडून अमृत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीवर परिणाम होणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.
आयुक्तांच्या या वक्तव्याला विरोध केला होता, अशी माहितीही महापौरांनी दिली. पुण्याची लोकसंख्या व खडकवासला धरणातून उचलण्यात येणारे पाणी याआधारे प्रशासनाकडून पाणी मोजण्यात चूक केली जाते. धरणातून जेवढे पाणी उचलले जाते, तेवढे पाणी पुण्याला मिळतच नाही. त्यामुळे मुळात पुणेकरांना माणशी ३०० लिटर पाणी मिळते, यातच चूक आहे. त्यातील सत्यता तपासून पाहावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. आता मात्र आपण आयुक्तांनी कोणत्या अहवालाच्या आधारे हा हिशेब केला त्याची चौकशी करू, असे महापौर म्हणाले.