‘अवकाळी’वरील गोंधळ अर्धा तासच टिकला
By Admin | Published: March 11, 2015 01:51 AM2015-03-11T01:51:28+5:302015-03-11T01:51:28+5:30
राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस
मुंबई : राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा बाकीचे कामकाज बाजूला सारून आधी घ्या, अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंगळवारी विधानसभेत आक्रमक झाले खरे पण या मुद्यावरून त्यांचा गोंधळ केवळ अर्धा तास टिकला. विरोधकांनी सभात्याग केला. सरकारने आपल्या इच्छेनुसार कामकाज पूर्ण केले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी अवकाळी पावसाच्या नुकसानीची चर्चा करा, अशी मागणी केली.
विरोधीपक्षनेते विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चर्चेची मागणी कायम ठेवली. विरोधी सदस्यांनी सरकार आणि अध्यक्षांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांचा धिक्कार करणे हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगून, ‘माफी मागा नाही तर यांना निलंबित करा’, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हणताच गोंधळ अधिक वाढला. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, असे सांगत शिवसेनेचे गुलाबराव पाटील सरकारच्या बचावासाठी धावले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. विरोधक
बाहेर पडल्यानंतर कामकाज सुरूच राहिले. अशाप्रकारे बाकीचे कामकाज थांबवून अवकाळीवर चर्चा घडवून आणण्यात विरोधकांना यश आले नाही. शेवटी सत्तापक्षाने या विषयावर नियम २९३ नुसार आणलेल्या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. (विशेष प्रतिनिधी)