Maharashtra Politics: “जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:13 PM2022-11-22T16:13:17+5:302022-11-22T16:15:29+5:30

Maharashtra News: महाराष्ट्राचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

congress ashok chavan demands central govt should remove governor bhagat singh koshyari from his post over comment on chhatrapati shivaji maharaj | Maharashtra Politics: “जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

Maharashtra Politics: “जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. यातच आता महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त राज्यपाल कोश्यारींना तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. छत्रपत्री शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेली विधाने संतापजनक असून, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. केंद्र सरकारने विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे, अशी आमची मागणी आहे, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले.

नवीन राज्यपाल राज्यात तातडीने नियुक्त करावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या उद्गारांचा संपूर्ण देशभरात तीव्र भावना आहेत. हा एखाद्या राजकीय पक्षाचा, राजकारणाचा विषय नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अशी वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ही पहिली वेळ नाही. राज्यपालांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने केलेली आहेत. एखाद्या महत्त्वाच्या सैंविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी विधाने करणे उचित नाही. आणि म्हणून आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. राज्याच्या राज्यपालांची तातडीने राज्याबाहेर बदली करावी. नवीन राज्यपाल राज्यात तातडीने नियुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात अशी वादग्रस्त विधाने करणे योग्य नाही. महाराष्ट्राचा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा आणि समाजसुधारकांचा अपमान करत आहेत. महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यांचा निषेध करण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीसांना आता शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून आणि खोटी माहिती पसरवून महाराजांचा अपमान करून भाजप नेते आणि विविध पदांवर त्यांनी बसवलेले संघाचे बाहुले आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress ashok chavan demands central govt should remove governor bhagat singh koshyari from his post over comment on chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.