मुंबईतील नगरसेवक ‘अकार्यक्षम’

By admin | Published: April 20, 2016 02:46 AM2016-04-20T02:46:27+5:302016-04-20T02:46:27+5:30

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारीला लागलेल्या नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकावर मात्र प्रजा फाउंडेशनने लाल शेरे मारले आहेत़ गेल्या चार वर्षांत तब्बल ९१ टक्के नगरसेवकांनी

Corporators in Mumbai are 'inefficient' | मुंबईतील नगरसेवक ‘अकार्यक्षम’

मुंबईतील नगरसेवक ‘अकार्यक्षम’

Next

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारीला लागलेल्या नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकावर मात्र प्रजा फाउंडेशनने लाल शेरे मारले आहेत़ गेल्या चार वर्षांत तब्बल ९१ टक्के नगरसेवकांनी नागरी समस्यांवर दहापेक्षा कमी प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला आहे़ त्यातही दरवर्षीप्रमाणे रस्त्यांचे नामकरण हाच मुद्दा या लोकप्रतिनिधींसाठी जिव्हाळ्याचा ठरला आहे, असे सर्वेक्षणातून उजेडात आले आहे़
प्रजा फाउंडेशन या बिगर सरकारी संस्थेमार्फत दरवर्षी लोकप्रतिनिधींचे प्रगतिपुस्तक तयार करण्यात येते़ नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी प्रभावी माध्यम असलेल्या प्रभाग समितीमधील माहिती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे़ यामध्ये नगरसेवकांची हजेरी, विचारलेले प्रश्न, सोडविलेल्या नागरी समस्या, त्यासाठी लागलेला वेळ यांचा समावेश आहे़ या माहितीच्या आधारे महापालिकेचा कारभार ढासळत असल्याचे चित्र आहे़
प्रभाग समित्यांमध्ये नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली खरी़ २०१४ मध्ये १०९ तर २०१५ मध्ये १६१ प्रश्न विचारण्यात आले़ यामध्ये अनधिकृत बांधकाम, सुविधा आणि सार्वजनिक जागेचा वापर, खड्डे आणि कचऱ्यासंबंधी प्रश्नांचा समावेश आहे़ मात्र सर्वाधिक प्रश्न हे रस्त्यांच्या नामकरणासाठीच असल्याचे उघड झाले आहे़ (प्रतिनिधी)
>नामकरणाचेच स्वारस्य का?
२०१४ प्रमाणेच गेल्या वर्षभरात रस्त्यांवर सर्वाधिक १९४ प्रश्न विचारण्यात आले. मात्र यामध्ये प्रत्येक सातपैकी एक प्रश्न नामकरणाचा आहे़ रस्त्यांसाठी नाव सुचविण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना असतात़ गेल्या काही वर्षांमध्ये सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे़ या रस्त्यांना दिवंगत राजकीय नेता, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी यांची नावे देण्यात येतात.ही नावे सुचवून आपल्या विभागात चमकण्यासाठी नगरसेवकांची चढाओढ सुरू असते़ काही रस्त्यांचे पुन्हा नामकरण केले जात आहे़
> या विभागांवर
नागरी समस्यांचे संकट
२००८ ते २०१५ असे गेल्या सात वर्षांमध्ये नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी पालिकेने घेतलेला वेळ पाहून २०१६ ते २०१८ या तीन वर्षांतील अंदाज ‘प्रजा’ने बांधला आहे़ त्यानुसार मालाड, कुर्ला आणि ताडदेव, ग्रँट रोडपाठोपाठ आता भांडुप, कांदिवली, कुर्ला, वांद्रे, चेंबूर या पाच वॉर्डांमध्ये या तीन वर्षांमध्ये रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडेल, असा दावा ‘प्रजा’ने केला आहे़ तर दूषित पाणीपुरवठा आणि अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूंना अंधेरी पश्चिम, एलफिन्स्टन आणि ग्रँट रोड या तीन वॉर्डांना तर कीटकनाशक समस्यांना भांडुप, घाटकोपर आणि मोहम्मद अली रोड येथील नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे़, असे अहवालातून दिसून येत आहे.
> सर्व नागरी तक्रारी सरासरी तीन दिवसांमध्ये सोडविण्याचा नियम आहे़ मात्र २०१५ मध्ये नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सरासरी १३ दिवसांचा कालावधी लावला आहे़ यामध्ये धोकादायक ठरणाऱ्या उघड्या गटारांबाबत तक्रारी आल्यानंतर झाकण बसविण्यासाठी तब्बल १८ दिवस पालिकेने लावले आहेत़ तर संगणकीकृत झाल्यानंतर तीन दिवसांमध्ये मिळणे अपेक्षित असलेला जन्माचा दाखला देण्यासाठी पालिकेने सरासरी १२ दिवस घेतले़ २०१४ मध्ये भांडुप वॉर्डातील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल ८७ दिवस लावण्यात आले होते़
> २०१३ ते २०१५ पाच प्रमुख तक्रारी
रस्ते, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि परवाना याबाबत नागरिकांकडून सर्वाधिक तक्रारी येत असतात़़ गेल्या तीन वर्षांमध्ये ४१ टक्के, २७ टक्के आणि २० टक्के अशा रस्त्यांच्या तक्रारी आहेत़ तर २०१३, २०१४, २०१५ या तीन वर्षांमध्ये मलनि:सारण वाहिन्यांच्या तक्रारींमध्ये १५ टक्के आणि पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे़
> खड्ड्यांबाबत जनतेचा
आवाज दाबला
मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ २०११ मध्ये सुरू करण्यात आले़ यावर आलेल्या तक्रारींची दखल ४८ तासांमध्ये घेणे बंधनकारक असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होत. तक्रारींची तत्काळ दखल घेणे अधिकाऱ्यांना भाग पडत होते़ मात्र
१ एप्रिल रोजी या सॉफ्टवेअर कंपनीचे कंत्राट संपले आणि हे संकेतस्थळ बंद करण्यात आले़
> देवनारची आग आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटली
देवनार डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीचे चित्र नासाच्या उपग्रहाने टिपले आहे़ त्याचे जगभरात थेट प्रसारण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईच्या प्रतिमेला धक्का बसला आहे़ मात्र कचरा व डम्पिंग ग्राउंड समस्येबाबत गेल्या चार वर्षांमध्ये अवघे नऊ प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़
> मुंबईची हवा बिघडली
प्रदूषणासंदर्भातील तक्रारींमध्ये वर्षभरात वायुप्रदूषणात ७० टक्के वाढ झाली आहे़ दिवाळीत ११ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली होती़ मात्र याबाबत प्रभाग समित्यांच्या बैठकीत नगरसेवकांनी एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही़
> २०१३ ते २०१५ मधील तक्रारी
जलजोडणीमध्ये बेकायदा कनेक्शन २६ टक्के ़
पालिकेची जमीन, रस्ते, पदपथ, पर्जन्य जलवाहिन्यांच्या तक्रारींमध्ये २४़८ टक्के वाढ
२०१४ ते २०१५ मध्ये खड्ड्यांच्या तक्रारींमध्ये झाली
५३ टक्क्यांनी घट
२०१४ मध्ये रस्त्यांच्या रिसर्फेसिंगची तक्रार ७९ टक्के होती़ यामध्ये २६ टक्क्यांनी घट झाली आहे़
स्वच्छ भारत अभियानामुळे हाऊसगल्ली, पालिका मंडई, कचरा उचलण्याचे केंद्र येथील तक्रारींमध्ये ४३ टक्के घट झाली आहे़
> २०१५ या वर्षातील
टॉप तीन तक्रारी
अंधेरी पश्चिम प्रभागात रस्त्यांबाबत १०५३ तक्रारी आल्या, मात्र नगरसेवकांनी केवळ १९ प्रश्न उपस्थित केले़ तर कुर्ला प्रभागात ८४४ तक्रारींमध्ये १३ प्रश्न तर मालाड विभागात ११३४ तक्रारींवर १५ प्रश्न उपस्थित झाले आहेत़
मलनि:सारण समस्येबाबत अंधेरीत ८२९ तक्रारींवर दोन प्रश्न, कुर्ला भागात ८६६ तक्रारींत एक प्रश्न, मालाडमध्ये ४९६ तक्रारींमध्ये तीन प्रश्न विचारले गेले.
घनकचरा तक्रारींबाबत अंधेरीत २४९ तक्रारींमध्ये प्रश्न पाच, कुर्ला ३८५मध्ये प्रश्न ५, मालाड २५७ तक्रारींत प्रश्न आठ़
जी उत्तर म्हणजे दादर प्रभागामध्ये तक्रारीत तीन टक्के वाढ झाली आहे़ तर उर्वरित सर्व वॉर्डांमध्ये नागरी तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे़ कांदिवली आणि चेंबूरमध्ये हे प्रमाण ३२ टक्क्यांनी घटले आहे़
> भाजपा नगरसेविका मौनी
विधी समितीच्या विद्यमान अध्यक्षा भाजपाच्या उज्ज्वला मोडक व ज्योत्स्ना परमार प्रभाग समितीच्या बैठकीत मौनी ठरल्या आहेत़ काँग्रेसचे नगरसेवक प्रभाग समित्यांमध्ये सर्वाधिक प्रश्न उपस्थित करीत असल्याचे दिसून आले आहे़ तर सत्ताधारी शिवसेना व भाजपाच्या नगरसेवकांनी केवळ १ ते ५ प्रश्न उपस्थित केले आहेत़

Web Title: Corporators in Mumbai are 'inefficient'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.