ई-टेंडरिंग पद्धतीवरून सरकारवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2015 02:27 AM2015-09-15T02:27:57+5:302015-09-15T02:27:57+5:30
आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. भ्रष्टाचार होऊ नये याच मताचे आम्ही आहोत. पण ई-टेंडरिंगच्या नावाखाली विकासकामेच होत नसतील तर सरकार काय कामाचे, असा सवाल
मुंबई : आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. भ्रष्टाचार होऊ नये याच मताचे आम्ही आहोत. पण ई-टेंडरिंगच्या नावाखाली विकासकामेच होत नसतील तर सरकार काय कामाचे, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ई-टेंडरिंग पद्धतीवर ताशेरे ओढले.
शिवसेना विभाग क्रमांक १ आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने त्रिमूर्ती, नॅशनल पार्क येथे एक लाख झाडे लावण्याच्या शुभारंभाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. ते
म्हणाले, ३ लाख रुपयांपेक्षा
जास्त खर्चीक कामांसाठी ई-टेंडरिंग करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
तीन लाख काय तीन रुपयांचे ई-टेंडरिंग करा, पण कामे करा. प्रत्यक्षात कामे किती होतात. कामेच होत नसतील तर ई-टेंडरिंगचा काय
उपयोग? भ्रष्टाचार होतो म्हणून कामच करायचे नाही, हे योग्य नाही. कोणतीही पद्धत अवलंबा पण कामे होऊ द्या,
असे सांगत याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात ५० हजार झाडे लावण्यात आली आहेत. शिवाय प्रकाश सुर्वे आणि प्रकाश कारकर यांनी या वेळी दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. (प्रतिनिधी)
आदिवासी पाड्यांची पुनर्वसनाची मागणी
१० आदिवासी पाड्यांचे याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. यावर उद्धव यांनी तुम्ही आराखडा द्या. काम नियमात बसणारे आणि करता येणारे असेल तर या पाड्यातील ३० हजार रहिवाशांचे नक्कीच पुनर्वसन करू, असे नमूद केले.