अंगणसेविकांची भरती रखडली
By admin | Published: May 19, 2016 03:47 AM2016-05-19T03:47:12+5:302016-05-19T03:47:12+5:30
१३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया ही पात्र असलेल्या उमेद्वारातूनच परंतु ती ग्रामसभेतूनच करावी,
भातसानगर : १३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया ही पात्र असलेल्या उमेद्वारातूनच परंतु ती ग्रामसभेतूनच करावी, असे आदेश असल्याने शहापूर ताल्युक्यातील १८ पदांची भरती रखडली आहे. ग्रामसभांमध्ये होणाऱ्या वादांमुळे ती रखडल्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया करताना १०० पैकी ६० गुण असणाऱ्या अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस या पदांसाठी निवड सूची तयार करावी त्यातून ग्रामसभा ज्या उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देईल, त्यांची त्या त्या पदांवर नियुक्ती करावी. अशा प्रकरणात गुणवत्ता यादीतील गुणानुक्र म कोणताही असेल तरी त्याचा विचार करण्यात येवू नये. म्हणजे ज्या उमेदवारास अधिक गुण असतील तरीही कमी गुणधारकाची निवड ग्रामसभा करू शकते. त्यामुळे गावागावात वाद होत आहेत.
नुकत्याच झालेल्या चिखलगाव, किन्हवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभामध्ये हे वाद झाले आहेत. शहापूर तालुक्यातील ११ मिनी अंगणवाडीसेविका, ३ अंगणवाडी सेविका,४ मदतनीस अशी १८ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. मात्र ती आजवर पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)