मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा

By admin | Published: November 9, 2014 12:51 AM2014-11-09T00:51:41+5:302014-11-09T00:51:41+5:30

मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो.

The danger hour of mobile towers | मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा

मोबाईल टॉवर्सची धोक्याची घंटा

Next

बचावाकरिता नियमांचे पालन आवश्यक : रेडिएशन ठरू शकतात प्राणघातक
नागपूर : मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. इतकेच नाही तर एका प्रयोगानुसार गरोदरपणाच्या काळात मोबाईलच्या वापरामुळे त्याच्यातून निघणारी किरणे होणाऱ्या बालकांवर नकारात्मक प्रभाव टाकतात.
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या किरणांचा मोठा प्रभाव हृदयावरही पडतो. माणूस हा विद्युत संवेदनशील म्हणजे इलेक्ट्रिकली सेन्सेटिव्ह असतो. जेव्हा मायक्रोवेव्ह रेडिएशन मोबाईलमधून येतात, तेव्हा ते हृदयाला प्रभावित करतात. याच्या अधिक वापरामुळे इतर काही लक्षणेही दिसतात.
यामध्ये डोक्याच्या त्वचेमध्ये जळजळ होणे, थकवा येणे, झोप न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थपणा, हृदयाचे ठोके वाढणे इतकेच नाही तर पचनक्रियेवरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
युरोपीय रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधनानुसार मोबाईलमधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे किडनी स्टोन किंवा आरोग्यासंबंधी अन्य गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या वापरामुळे कर्करोग झाला असे सांगण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा नसतो. कारण मोबाईल वापरण्याआधीची आकडेवारी, मोबाईल वापरल्यानंतरची आकडेवारी, तसेच मोबाईल किती प्रमाणात वापरला याची आकडेवारी आणि त्यातून सांख्यिकीदृष्ट्या काढलेला निष्कर्ष ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. म्हणूनच याबाबतचे ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत, पण तरीही आपल्याला अनेक वर्षांपासून किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम माहीत असल्याने आपण त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
भारतात जवळपास ९० कोटी लोक मोबाईल फोनचा वापर करतात. रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना, इतकेच नाही तर रेल्वे रुळ ओलांडतानादेखील माणसे मोबाईलवर बोलत असतात. त्यातूनच अपघाताच्या अनेक घटना घडतात, पण तरीही आपण जागृत होत नाही. ‘प्राण जाये पण मोबाईल न जाये’ अशी स्थिती आपल्याकडे आलेली दिसते, पण ही परिस्थिती खूप घातक आहे.
दुष्परिणामांपासून बचावाचे उपाय
मोबाईलच्या दुष्परिणामांपासून बचावासाठी मोबाईल साक्षरता आणि परिपक्वता आवश्यक आहे.
शक्यतो मोबाईलवर बोलताना कामापुरतेच बोलावे.
तासन्तास गप्पा मारत बसू नये.
शक्य असेल तिथे लँडलाईन फोनचा उपयोग करावा.
एसएमएसद्वारेदेखील निरोप पोहचवता येऊ शकतात.
मोबाईल टॉवर बसविण्यासंदर्भातील नियमावली
शैक्षणिक संस्था व इस्पितळांच्या परिसरात मोबाईलचे टॉवर बसवू नयेत. त्यामुळे मुलांना व आजारी व्यक्तींना कमी प्रतिकारशक्तीमुळे किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो.
चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये मोबाईल टॉवर्स बसवू नयेत. कारण वादळ व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत ते अधिक धोक्याचे ठरू शकतात.
मोबाईल टॉवर बसविताना तो कमीत कमी तीन मीटर दूर असला पाहिजे व अँटिना इमारतीच्या दिशेने ठेवू नये.
बेस स्टेशन अँटिना जमिनीपासून तसेच छतापासून तीन मीटर उंचीवर बसवावा.
लोकांना अशा टॉवरजवळ जाता येऊ नये म्हणून टॉवरच्या भोवताली संरक्षक भिंत व तारा लावाव्यात.
टॉवरजवळ धोक्याची सूचना असलेला मोठा फलक लावणे, तसेच त्या भागात धोक्याचा इशारा असलेली सूचना लावणे कंपनीवर बंधनकारक आहे.
मोबाईल टॉवरसंबंधी कामे करणाऱ्या कामगार व तंत्रज्ञांना विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गापासून संरक्षण देणे आवश्यक आहे.

Web Title: The danger hour of mobile towers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.