ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, “जर दबाव आणला तर ते...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 14:18 IST2023-05-12T14:14:44+5:302023-05-12T14:18:08+5:30
Devendra Fadnavis News: निकाल त्यांच्या बाजूने आला असे ते म्हणत असतील तर त्यांनी ढोल बडवावेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, “जर दबाव आणला तर ते...”
Devendra Fadnavis News: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता महाविकास आघाडी तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारकडून चुकीचे दाखले दिले जात असल्याचा दावा केला आहे. तसेच अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना इशारा दिला आहे.
नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकारच नाही. जे मोदींचे फोटो लावून निवडून आले. आल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचारही सोडला, युती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात ते मला समजतच नाही. निकाल त्यांच्या बाजूने आला असे ते म्हणत असतील तर त्यांनी ढोल बडवावेत, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
योग्य सुनावणी करून योग्य निर्णय ते घेतील
अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर बोलताना, सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातील सगळे अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर ते मुक्त आणि न्याय्य अशा प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की, अध्यक्ष कोणत्या दबावाला बळी पडतील. विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील आहेत. त्यामुळे ते कायद्यानुसार निर्णय घेतील. योग्य सुनावणी करून योग्य निर्णय ते घेतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, शरद पवारांचा नैतिकतेशी काही संबंध आहे का? आता जर शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच होईल. मग इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले इथून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या. ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात. इतके लक्ष द्यायचे नसते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.