जंगलतोडीमुळे कोसळताहेत दरडी
By admin | Published: July 20, 2015 01:44 AM2015-07-20T01:44:27+5:302015-07-20T01:44:27+5:30
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचा कमी-अधिक होणारा जोर, जंगलातील कमी होणारी माती, वृक्षतोड आणि विकास कामांमुळे कापले जाणारे डोंगर; अशा अनेक
सचिन लुंगसे, मुंबई
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचा कमी-अधिक होणारा जोर, जंगलातील कमी होणारी माती, वृक्षतोड आणि विकास कामांमुळे कापले जाणारे डोंगर; अशा अनेक घटनांमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संबंधित ठिकाणी वेगाने जाणाऱ्या वाहनांचे हादरेही अशा दरडींना बसतात. त्यामुळे अशा घटना वाढतच राहतात, असेही पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटजवळ रविवारी दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत असून, या घटनांशी बिघडणाऱ्या नैसर्गिक असमतोलाचा संबंध पर्यावरण तज्ज्ञांनी जोडला आहे.
पर्यावरणतज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दरडी कोसळण्याच्या घटनांना येथील जंगलतोड आणि डोंगरतोड कारणीभूत आहे. जंगलतोड झाल्यानंतर मूळांनी धरून ठेवलेली माती विस्कळीत होते. ती मुख्य प्रवाहापासून तोडली जाते. जेव्हा विकासकामे म्हणजे रस्त्यांसाठी काटकोनात डोंगर तोडले जातात, तेव्हा डोंगरांची यंत्रणा खिळखिळी होते. डोंगर अथवा दरडीमध्ये भेगा निर्माण होतात. त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरते. शिवाय अशा दरडी अथवा डोंगरांवर उन्हाचाही परिणाम होत असतो. पावसासह उन्हाच्या माऱ्यामुळे खडकावरील मातीचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे खडक उघडा पडतो. अशा अनेक कारणांनी डोंगराची अथवा दरडीची यंत्रणा खिळखिळी झाली, की त्या आपोआप कोसळू लागतात. कोकणातील दरडी वारंवार कोसळण्यामागेही हीच कारणे आहेत.