जेजुरी बाजारतळावर घाणीचे साम्राज्य
By admin | Published: May 21, 2016 01:16 AM2016-05-21T01:16:54+5:302016-05-21T01:16:54+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे.
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे. तेथे व्यापारी व बाजारकरूंसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बाजारतळात आधुनिक सोयीसुविधांची अपेक्षा आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने कुलदैवत खंडोबाचा रविवार हा वार असल्याने दर रविवारी देवदर्शनासाठी राज्यभरातूनच नव्हे तर जेजुरी परिसरातील खेड्यातून भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर या अनास्थेवर टकालेला प्रकाश.
रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस होता. दर रविवारी येथे आठवडे बाजार भरत होता. आता मात्र जेजुरीत रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने गेल्या वर्षीपासून जेजुरी नगरपालिकेने रविवारऐवजी गुरुवारचा आठवडे बाजार केला आहे.
शहरातील मध्यवस्तीतील सुमारे एक एकर क्षेत्रावर हा बाजार भरतो. आज ती जागाही कमी पडू लागली आहे. बाजूलाच जिल्हा परिषदेची सुमारे दोन एकर मोकळी जागा आहे. त्या जागेत ही बाजार भरू लागला आहे.
बाजाराला जागा कमी पडत असल्याने पालिकेने जिल्हा परिषदेच्या या जागेवरच नवीन विकास आराखड्यात आरक्षण टाकून आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)
>वर्षाला १६ लाख रुपयांचे उत्पन्न
पालिकेने बाजारतळाची जागा मोठी करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला असला तरीही येथे बाजारकरूंना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे मात्र दुर्लक्षच केलेले आहे.
या बाजारतळातून पालिकेला बाजारकरापोटी वर्षाला सुमारे १६ लाख रुपयांचे मोठे उत्पन्न मिळते.
मात्र त्या बदल्यात सुविधा दिल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परिसरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पालिकेने बांधलेल्या ओट्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.
पावासाळळ्यामध्ये बाजार करताना शेडची सुविधा उपलब्ध नाही.
४तुटक्या ओट्यावरच माल मांडून विकावा लागतो. बाजारात येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही की स्वछतागृहही नाही. जे आहे त्याची ही मोठी दुरवस्था असल्याने त्याचा वापरही कोणी करत नाही. बाजारात प्रवेश करण्यासाठी अरुंद रस्ते असल्याने बाजाराची वाहने तळाकडे नेणे मोठे जिकिरीचे झालेले आहे. मोकळे पटांगण असूनही लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
येथे मोठे व विस्तीर्ण पटांगण असूनही योग्य नियोजन आणि सुविधा नसल्याने बाजारकरूंचे मोठे हाल होत आहेत.
याकडे पालिकेने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाजारातील व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. आमच्याकडून बाजारकर वसूल केला जातो.
त्याच्या बदल्यात आम्हाला सुविधा मात्र मिळत नसल्याच्याच तक्रारी नागरिकांनी आहेत.