‘मार्केटिंग’मध्ये कमी पडू नका!
By admin | Published: July 28, 2014 03:59 AM2014-07-28T03:59:00+5:302014-07-28T03:59:00+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘मार्केटिंग’ केले. त्याचा फायदा त्यांना झाला. आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाची गंगा आणली
नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘मार्केटिंग’ केले. त्याचा फायदा त्यांना झाला. आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाची गंगा आणली. ही कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सरकारच्या कामाचे ‘मार्केटिंग’ करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला जागावाटपाचा तिढा हा नवी दिल्लीतच सुटेल, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्याप्रमाणे नागपूर व विदर्भात राष्ट्रवादीला ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. परंतु आत्ताच काही दावा करीत नाही कारण जागावाटपाचा निर्णय हा नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठी करतील, असे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे ते म्हणाले. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकमेकांच्या सहकार्याने यश मिळाले. परंतु काँग्रेसचे काही नेते चुकीचे दावे करताहेत. आम्ही पण तसेच दावे करावे का, या शब्दांत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना चिमटा काढला.
पदे मिळत नाहीत अशी विदर्भातील कार्यकर्त्यांची नेहमी तक्रार असते. आम्ही पदे देऊ, चिंता करू नका, फक्त अधिकृत उमेदवाराचा एकजुटीने व जोमाने प्रचार करा. झाले गेले विसरून जा, नव्या निर्धाराने कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ काम करून भागत नाही, त्याचे प्रभावी ‘मार्केंिटंग’देखील हवे असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरेंची बाजू उचलून धरली.