नाटक हे पवित्र व्यसन!

By Admin | Published: February 20, 2016 03:21 AM2016-02-20T03:21:43+5:302016-02-20T11:11:22+5:30

नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की, दारू ही प्यायच्या अगोदर सुटते! त्यानंतर त्याची सुटका नाही.

Drama is sacred addiction! | नाटक हे पवित्र व्यसन!

नाटक हे पवित्र व्यसन!

googlenewsNext

96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश

नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की,
दारू ही प्यायच्या अगोदर सुटते! त्यानंतर त्याची सुटका नाही. आमचा नाटक धंदासुद्धा असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की रंगभूमीकडे त्याची पावले वळणारच. हे व्यसन आहे, एक पवित्र व्यसन...या नगरीत ठाण्याची शान असलेल्या दादोजी कोंडदेव मैदानात हे नाट्यसंमेलन भरत आहे हे भाग्यच. या ठाणे नगरीत भरलेल्या पहिल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. हे माझे परमभाग्यच!
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा कालावधी फक्त एका वर्षापुरता मर्यादित आहे. पण मनात आणलं आणि निश्चय केला तर अनेक गोष्टी करता येतील.
त्याची सुरुवात बालरंगभूमीपासूनच करायला हवी. बालरंगभूमी बाळसेदार होण्यासाठी पहिल्या इयत्तेपासूनच नाट्यविषय हा समाविष्ट करून घ्यायला हवा.
मुलांना नाट्यविषय शिकविण्यासाठी शाळेतील शिक्षकांनाच नाट्यविषयाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. नाट्यलेखनसुद्धा शिक्षकांनीच करायला हवं. बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यांचा विचार केला तर प्रायोगिक रंगभूमी अधिक सक्षम होत असल्याचं जाणवतंय. त्याला कारण महाराष्ट्र राज्य गेली पच्चावन्न वर्षे राज्य स्तरावर घेत असलेल्या नाट्यस्पर्धा.
पूर्वीच्या काळात संस्थानिक / राजे कलावंतांना राजाश्रय द्यायचे. त्याच धर्तीवर लोकप्रतिनिधींनी भरघोस रकमेच्या बक्षिसांच्या नाट्यस्पर्धा भरवाव्यात. आयपीएलच्या पद्धतीने लोकप्रतिनिधींमध्येच नाट्यस्पर्धा व्हावी. पहिल्या क्रमांकावर आलेलं नाटक हे खासदार महाशयांनी दत्तक घ्यावं आणि त्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करावेत. अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला आणि नाट्य परिषदेला मला कळकळीची विनंती करावीशी वाटते की, त्यांनी विविध बोलीभाषेतील लेखकांना त्यांच्या बोलीभाषेतील नाटक लिहायला
भाग पाडून वर्षभराच्या आत बोलीभाषेतील नाटकांच्या स्पर्धेचं आयोजन करावं. त्याचं पालकत्व नाट्य परिषदेनं घ्यावं आणि महाराष्ट्रभरात प्रयोग करावेत.
एकेकाळी सुवर्णयुग असलेल्या संगीत रंगभूमीचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे. शासनाकडून संगीत नाटकांची स्पर्धा होते. त्यात जुनीच नाटकं सादर केली जातात. नवीन असं काही सापडतच नाही. २००६ साली नांदेड येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात नाट्य परिषदेने एकपात्री प्रयोग करणाऱ्या कलावंतांना संमेलनात स्वत:चं व्यासपीठ तर मिळवून दिलंच; शिवाय वर्षातून एका कलावंताला संमेलनातच पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला. नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की, दारू ही प्यायच्या अगोदर सुटते. त्याच्यानंतर त्याची सुटका नाही. आमचा नाटक धंदासुद्धा असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की मग तो तोडाला रंग लावलेला रंगकर्मी असो की नाट्य व्यवस्थापक, निर्माता असो, रंगभूमीकडे त्यांची पावले वळणारच.
या घडीला नाटक धंदा कितीही तोट्यात असला तरी वर्तमानपत्राची पानं उघडली की दोन दोन पानांवर नाटकांच्या एकापेक्षा एक देखण्या जाहिराती दिसतात. धंदा तोट्याचा मग जाहिराती कशा? यालाच म्हणतात नाट्यव्यसन. हेही व्यसन असले तरी ते पवित्र व्यसन आहे, अशी माझी भावना आहे. एका महत्त्वाच्या बदलाचे स्वागत आज मुद्दाम करावेसे वाटते. पूर्वी नाट्यनिर्मितीची पालखी ही पुरुषच वाहून नेत होते. पण बदलत्या काळात आता पुरुषांच्या बरोबरीने अनेक महिला निर्मात्याही सक्रिय आहेत, ही एक अभिमानाची घटना म्हणावी लागेल. नाटकाचा खर्च कमी करायचा असेल तर सांस्कृतिक खात्याने आमच्या निर्मात्यांना नाटकाच्या तालमींना अल्पदरात परवडेल अशा जागा उपलब्ध करून द्याव्यात. उड्डाणपुलाखालील ज्या रिकाम्या जागा आहेत तेथे नाट्य निर्मात्यांच्या गाड्या उभ्या राहण्यासाठी जागा आरक्षित ठेवावी आणि अशाच रिकाम्या जागेत नाटकांचे सेट ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करावी. म्हणजे खाजगी आणि महानगरपालिका यांच्या अखत्यारीत असलेल्या नाट्यगृहांची भाडी कमी करता येतील.
चर्चेअंती यावर तोडगा काढावा, काही शाळांमधून शाळेच्या कारभारात व्यत्यय न आणता तेथे नाटकांच्या तालमींसाठी अल्पदरात जागा उपलब्ध करून देता येईल का? याचा शाळांच्या संचालकांशी चर्चा करून विचार करावा. पडद्यामागील कलावंतांच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षे अनुत्तरित आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईपासून जवळच म्हणजे पनवेलच्या आसपास एखादा भूखंड कलावंतांच्या सदनिकांसाठी उपलब्ध करून द्यावा. ज्या मराठी संस्था, शाळा वगैरे रंगभूमीविषयक उपक्रम राबवतात किंंवा इतरांच्या उपक्रमात, स्पर्धेत सहभाग घेतात त्यांनाही शासनाने अनुदान द्यावे.
राज्य सरकारने, नाट्य परिषेदेने त्यादृष्टीने संमेलनाध्यक्षांच्या ‘भटकंतीस’ सुसह्य होईल अशी व्यवस्था करावी.
हे अखिल भारतीय स्तरावरले पद असल्याचे भान मला आहे. आता कक्षा रुंदावल्या पाहिजेत. देशभरातील नाट्यचळवळींशी कुठेतरी संवाद साधला जावा, ही अपेक्षा आहे. त्यादृष्टीने साऱ्यांचे सहकार्य मिळावे.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची वैभवशाली परंपरा आहे, जी उभ्या जगात कुठेही दिसत नाही. केवळ दोन महिने शिल्लक असताना ठाणेकरांना संमेलन भरविण्याचे आमंत्रण मिळाले. पण कुठलेही आव्हान पेलण्याची क्षमता ठाणेकरांमध्ये असल्यामुळे हे आव्हान स्वीकारून देदीप्यमान, न भूतो.. अशी तयारी केलेली आहे. झपाट्याने बदलत आणि बहरत असलेली सांस्कृतिक नगरी म्हणजे ठाणे! आज जेथे नाट्यसंमेलन भरत आहे त्याजवळच दिवा परिसरात काही वर्षे मी वास्तव्याला होतो. ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’ या माझ्या दोन्ही नाटकांचा जन्म हा इथलाच. तेव्हापासून या शहराशी माझं नातं गच्च जुळलं गेलं. आज तसा मी मुंबईकर असलो तरी या ठाण्यातच अधिक रमतो.ही नगरी एकेकाळी तलावांची नगरी म्हणून ओळखली जात होती. आज तिला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी अशी नवी ओळख मिळाली आहे. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक तरुणांची संख्या ही इथेच आहे. पूर्वी संस्थानिकांच्या काळात इथेच नाट्यकलेला राजाश्रय मिळाला.

Web Title: Drama is sacred addiction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.