"आमच्या सर्व चर्चा व्यवस्थित सुरू आहेत, एकनाथ शिंदे नाराज असते तर..."; संजय शिरसाट स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:14 IST2024-12-13T14:14:08+5:302024-12-13T14:14:56+5:30
"कसल्याही प्रकारची नाराजी वैगेरे नाही. त्यांचा (एकनाथ शिंदे) स्वभाव तडक-फडक आहे. शिंदे जे बोलतील ते स्पष्ट बोलतील. त्यांनी सरळ सांगितले आहे की तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे."

"आमच्या सर्व चर्चा व्यवस्थित सुरू आहेत, एकनाथ शिंदे नाराज असते तर..."; संजय शिरसाट स्पष्टच बोलले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर सरकारही स्थापन झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. मात्र अद्याप सरकारचे खेतेवाटप होऊ शकलेले नाही. खातेवाटपासंदर्भात अद्यापही तीन्ही पक्षांमध्ये खल सुरू आहे. यातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये होताना दिसते आहे. यासंदर्भातत आता शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "कसल्याही प्रकारची नाराजी वैगेरे नाही. त्यांचा (एकनाथ शिंदे) स्वभाव तडक-फडक आहे. शिंदे जे बोलतील ते स्पष्ट बोलतील. त्यांनी सरळ सांगितले आहे की तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. त्यामुळे एवढे सर्व झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नाही. शिंदे नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे. शिंदे आणि बावनकुळे यांची काल भेट झाली. आमच्या सर्व चर्चा व्यवस्थित सुरू आहेत आणि महायुती म्हणूनच हे सरकर स्थापन होणार आहे. त्यात कुणीही अडसर आणणार नाही, याची आम्हाला खात्री आहे," शिरसाट मुंबईत टीव्ही9 सोबत बोलत होते.
...यासीठी आता केवळ एका दिवसाची वाट बघायची आवश्यकता आहे
शिरसाट पुढे म्हणाले, "प्रत्येक पक्ष हा खातेवाटपावेळी काही खाती मागत असतो. ती आम्हीही मागितली. याची तडजोड संबंधित तिन्ही नेते (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) एत्र बसून करतील आणि ठरवतील. यासीठी आता केवळ एका दिवसाची वाट बघायची आवश्यकता आहे. एक दिवसानंतर ते ठरेल आणि एकदा ठरल्यानंतर आमच्यात कुठलाही वाद असणार नाही, अत्यंत मजबुतीने हे सरकार चालेल, एवढे मात्र निश्चित.
सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकणार नाही -
खातेवाटपाला होत असलेल्या विलंबासंदर्भातत बोलताना शिरसाट म्हणाले, "खातेवाटपासंदर्भात घोळ असण्याचे काहीही कारण नाही. मला वाटते, या सर्वांचा निर्णय उद्या होऊन जाईल. हे सर्व आनंदाने आणि एकमेकांना समजून घेऊन होईल. सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकणार नाही."
एकनाथ शिंदे नाराज असते, तर... -
"शिंदे यांनी काल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. त्यात त्यांनी, आपल्याला महायुती म्हणून लढायचे आहे, महापालिका जिंकायची आहे, असे सर्वांना सांगितले आहे. हे कशासाठी आहे. हे याच साठी आहे की, आपल्याला महायुती म्हणून मजबुतीने मुंबई महापालिकाही काबीज करायची आहे. यामुळे नाराज असते, तर अशा बैठका त्यांनी घेतल्या असत्या का? अशा सूचना त्यांनी दिल्या असत्या का? कार्यकर्त्यांना कामाला लावलं असंत का? म्हणून या सर्व बातम्या आहेत. सूत्रांनुसार दिलेल्या बातम्या आहेत. शिंदे कधीही नाराज नाहीत आणि असले तर ते बोलल्याशिवाय राहणार नही. हे सर्वांना माहीत आहे. शिंदे या सर्वांच्या फार पुढे आहेत. यामुळे त्यांच्या नाराजीच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत," असेही शिरसाट यावेळी म्हणाले.