कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

By प्रविण मरगळे | Published: June 27, 2022 05:05 PM2022-06-27T17:05:32+5:302022-06-27T17:06:37+5:30

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे

Eknath Shinde Revolt : Article on current situation on Maharashtra Political crisis, Shivsena, Uddhav Thackeray | कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

Next

प्रविण मरगळे 

महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची परिस्थिती पाहिली तर केवळ घराणेशाही, प्रस्थापित मंडळी यांच्यासाठीच सगळं काही, हे चित्र दिसून येते. कार्यकर्ता म्हटला तर नेत्यावर जीव ओवाळून टाकणारा, त्याची निस्सीम 'भक्ती' करणारा माणूस. हा कार्यकर्ता अलीकडे प्रचंड संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं. कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न त्याला पडू लागलाय. तरीही, तो अजूनही श्रद्धेनं आपल्या 'विठ्ठला'ची पूजा करतोय. पण, खांद्यावरचा तो झेंडा (कुठल्याही रंगाचा, शिक्क्याचा असो) थोडा बाजूला ठेवून त्यानं थोडा विचार करायची गरज आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी अक्षरश: रिक्षावाले, पानटपरी चालवणाऱ्या तळागाळातील व्यक्तींना सोबत घेऊन 'शिवसेना' नावाची संघटना बनवली. पुढे या संघटनेचे रुपांतर राजकीय पक्षात झाले. बाळासाहेबांनी गरीब घरातील मुलं राजकारणात आणली. कुणी नगरसेवक, कुणी आमदार तर कुणी खासदार झाले. संघर्षाच्या काळात साथ देऊन अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व उदयास आणले. मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी बाळासाहेबांनी तरुणांमध्ये ज्योत पेटवली आणि याच ज्योतीची मशाल घेऊन शिवसेनेत अनेक नेते बनले. परंतु, अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांप्रती लोकांमध्ये असलेली आपुलकीची भावना कुठेतरी नष्ट होताना दिसत आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. अर्थातच, या घडामोडींवर सगळ्यांचं लक्ष आहे. पण, 'कार्यकर्ता' नावाचा गट ज्या प्रकारे रिएक्ट होतोय, तो काळजीचा मुद्दा आहे. अर्थात, हे नवं नाही.  

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते ज्यांनी ११ वेळा विधानसभेत विजय मिळवला. एकनिष्ठ आणि एकच पक्ष असलेला असा लोकनेता पुन्हा होणे नाही. आजच्या राजकीय नेत्यांकडे पाहिले तर जिथे सत्ता तिथे चांगभलं. शेवटी राजकारणात सत्तेला अधिक महत्व असतं. राजकीय नेते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या मार्गाने वाटचाल करत असतात. कुणी टेंडरसाठी भांडते तर कुणी निधीसाठी, कुणावर ईडीची कारवाई होते तर कुणाच्या घरी कोट्यवधीचं घबाड सापडते. मात्र या सर्व घडामोडीत कार्यकर्त्यांचं काय होतं? 

नुकतेच एका नेत्यांच्या २ कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लीप ऐकायला मिळाली. नेते निवडणुका लढवणार, जिंकणार, पैसा कमवणार आणि कार्यकर्ते केवळ घोषणाबाजी, राडेबाजी, आंदोलन, मारामारी करायला पुढे जाणार. त्यात २०१९ नंतरच्या राजकारणानं कार्यकर्त्यांना जास्तच कन्फ्यूज केले आहे. आपण ज्या नेत्यांच्या मागेपुढे करतो ते नेते एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. समोर आले तर हात जोडून नमस्कार करतात. गळ्यात गळे घालतात. मात्र याच्याच विरुद्ध चित्र कार्यकर्ते समोरासमोर आले एकमेकांची डोकी फोडणार, कार्यालयं फोडणार, स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार, जेलमध्ये रात्र घालवणार अशीच बहुतांश प्रतिमा तयार झाली आहे. या ऑडिओ क्लीपमधील एक वाक्य मनाला भिडलं, ते म्हणजे 'आम्ही नेत्यांशी एकनिष्ठ पण नेतेच झाले बहुनिष्ठ" हे वाक्य आजच्या परिस्थितीला तंतोतंत जुळणारे आहे. 

सध्या शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोर झालेत. शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. बंडखोर नेते हॉटेलमध्ये मुक्काम करतात आणि नेतृत्व मातोश्री ते शिवसेना भवन व्हाया वर्षा असा प्रवास करतात. सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एक विधान केले. तुमचा मुलगा खासदार, माझा मुलगा बडवा, कसं चालेल? याचा साधा अर्थ असा की नेतेमंडळी स्वत:चं कुटुंब स्वत:ची जबाबदारी म्हणून सांभाळतात. नेत्याचा मुलगा नेताच असतो पण त्या कार्यकर्त्याचं काय जो नेत्यासाठी जीवाचं रान करतो? महाविकास आघाडीच्या राजकारणात तर आजवर ज्यांच्याशी भांडलो त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून नेत्यांनी सत्ता उपभोगली. परंतु, ज्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या, नेत्यांसाठी स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष केले त्यांचे पुढे काय? आतातरी कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा, स्वत:च्या कुटुंबाकडे, बायका-पोरांसाठी वेळ द्यावा!

Web Title: Eknath Shinde Revolt : Article on current situation on Maharashtra Political crisis, Shivsena, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.