कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा ग्राहकांना भुर्दंड
By admin | Published: May 17, 2016 02:23 AM2016-05-17T02:23:28+5:302016-05-17T02:23:28+5:30
महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते.
पिंपरी : महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते. वीजबचतीच्या अनेक उपाययोजना करुनही केवळ कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मुदतीत बिल न मिळाल्याने दंडाचा भार, तसेच उशिरा रिडिंग घेतल्याने दुप्पट ते तिप्पट रकमेचे बिल भरावे लागत आहे.
महावितरणतर्फे मासिक बिल दिले जाते. मात्र, ते मुदतीत मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. घरगुती बिल भरण्यास पहिली आणि दुसरी अशा दोन मुदत असतात. मुदत संपण्यास एक-दोन दिवस शिल्लक असताना ही बिले नागरिकांना मिळतात. त्यामुळे मुदतीपूर्वी बिल भरता येत नसल्याने दंडासह बिल भरावे लागते. कोणतीही चूक नसताना नागरिकांना हा आर्थिक भार सोसावा लागतो. पहिल्या मुदतीत बिल भरल्यास सूट मिळते. तर, दुसऱ्या मुदतीनंतर बिल भरल्यास दंड भरावा लागतो. सवलतीपासून ग्राहक वंचित राहतो. उलट, दुसऱ्या मुदतीच्या जवळपासच्या तारखेला बिल मिळाल्याने दंड सहन करावा लागतो.
बहुतेक भागात ठरावीक कालावधी बिलाचे वाटप होत नाही. बिलवाटप करणारे कर्मचारी बिले हौसिंग सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांच्या घरी न देता, प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांकडे देऊन मोकळा होतात. काही बिले पार्किंगमधील पत्रपेटीत कोंबली जातात. वाऱ्यामुळे ती उडून जातात किंवा पावसात भिजतात. त्यामुळे ते अनेकांना मिळत नाहीत. वाट पाहूनही बिल न मिळाल्याने नागरिकांना वीज वितरण केंद्रात जाऊन चौकशी करावी लागते. तेथून बिलाची प्रत घेऊन बिल जमा करण्याची कसरत करावी लागते.
मुदतीनंतर रक्कम अदा केल्यानंतर पुढील बिलात जुन्या रकमेसह बिल येते. महावितरणचे केंद्रावर जाऊन, अधिकाऱ्यांना गाठावे लागते. ते भेटल्यानंतर त्यांना विनवणी करून, बिल कमी करून घ्यावे लागते. मुदतीनंतर बिल भरल्याची नोंद कर्मचाऱ्यांकडे नाही. (प्रतिनिधी)