एका वादळाची अखेर

By admin | Published: September 1, 2016 07:36 PM2016-09-01T19:36:39+5:302016-09-01T19:36:39+5:30

शरद राव बऱ्याच काळपासून आजारी होते.

The end of a storm | एका वादळाची अखेर

एका वादळाची अखेर

Next

संजीव साबडे/आॅनलाइन लोकमत

शरद राव बऱ्याच काळपासून आजारी होते. त्यांचे परळच्या बाळ दंडवते स्मृतीमधील युनियनच्या कार्यालयात येणेही बंद झाले होते. पण आपण आजारी आहोत, त्यामुळे सहानुभूती व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी भेटायला येऊ नये, म्हणून त्यांनी आजारपणाची माहिती कोणाला देउ नका, असे नातेवाईकांना, अगदी जवळच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते.
देशातील आणि मुंबईतीलही कामगार संघटना आणि चळवळ संपत चालली असताना, शरद राव यांनी मात्र आपल्या संघटना मजबुत राहतील, याची काळजी घेतली. म्युनिसिपल मजदूर युनियन, म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियन, मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन, बेस्ट वर्कर्स युनियन, बॉम्बे लेबर युनियन, रिक्षा युनियन, बॉम्बे हॉकर्स युनियन, बॉम्बे गुमास्ता युनियन, एअरपोर्ट वर्कर्स युनियन, रेल मजदूर युनियन अशा कित्येक संघटना त्यांनी जॉर्ज फर्नांडिस दिल्लीत गेल्यानंतर केवळ सांभाळल्याच नाहीत, तर त्या आणखी वाढवल्या. या संघटनांमार्फंत कामगारांची आणि विविध स्वयंरोजगारातील मंडळींची ताकद ते सातत्याने दाखवत राहिले.
 महापालिका, बेस्ट, रिक्षा अशा साऱ्या संघटना त्यांच्या हाती असल्याने त्यांनी जे संप आणि बंद घडवून आणले, त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. जॉर्जनंतर मुंबईकरांनी सर्वाधिक टीका केली असेल, ती शरद राव यांच्यावरच. डॉ दत्ता सामंत यांच्यावरही त्यांच्या काळात खूप टीका झाली. पण डॉ. सामंत यांच्या संपाचा फटका कधी मुंबईकरांना बसला नव्हता. शरद राव हे कायमच मुंबईकरांच्या टीकेचे धनी ठरले. पावसाळ्यात सफाई कामगारांचा संप, त्यामुळे ठिकठिकाणी साचलेला कचरा, त्यातच टॅक्सी, रिक्षा, बेस्ट बसेचा संप यामुळे ते मुंबईकरांना वेठीस धरतात, असे आरोपही सर्व थरांतून झाले. पण कामगारांचे प्रश्न सोडवताना ते त्या टीकेकडे नेहमीच दुर्लक्ष करीत राहिले. जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले खरे. पण जॉर्जनाच नेता मानत राहिले. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीपेक्षा कामगार संघटनाच कायम महत्त्वाची असायची. ते एकदाच गिरगावातून महापालिका निवडणूक जिंकले आणि गोरेगावातून सुभाष देसाई यांच्याविरुद्धची निवडणूक कोर्टाच्या माध्यमातून जिंकले. ते पराभूत झालेल्या निवडणुका मात्र बऱ्याच आहेत.
बेस्ट वर्कर्स युनियन दुबळी होत चालली आहे, हे लक्षात येताच, आपलेच सहकारी नारायण फेणाणी यांना बाजूला सारून त्यांनी त्या संघटनेची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे त्यांचे अनेक सहकारी दुखावले. शरद राव महत्त्वाकांक्षेपोटी इतर नेत्यांना संपवू पाहत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. पण कोणतीही संघटना हिंद मजदूर पंचायत वा हिंद मजदूर किसान पंचायत या केंद्रीय कामगार संघटनेशी संलग्न राहावी, यासाठी ते हे सारे करीत होते.
शरद राव हे जॉर्जच्या मुशीतच तयार झालेले नेते. त्यामुळे अतिशय आक्रमकता हा गुण त्यांच्यातही होता. जॉर्जइतकेच रावही अभ्यासू होते. वकील नसतानाही कायद्याचा, कामगार कायद्याचा अभ्यास होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण नसतानाही इंग्रजी अप्रतिम होते. अनेक आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांशी ते संबंधित होते. अनेक आंतरराष्ट्रीय सेमिनारमधील त्यांची भाषणेही गाजली. पण इथे त्याची कोणालाच माहिती नव्हती. त्यांनीच बाळ दंडवते स्मृती या इमारतीची उभारणी केली. तळेगावात कामगारांच्या प्रशिक्षणासाठी डॉ. राम मनोहर लोहिया संस्थेची उत्कृष्ट वास्तु बांधली. तिथे कामगारांना एरवीही कुटुंबासह दोन दिवस राहता येईल, अशी व्यवस्था केली.
 गेल्या ४0 वर्षांत त्यांचा वाद झाला नाही , असा एकही महापालिका आयुक्त वा बेस्ट व्यवस्थापक नसेल. अर्थात कामगारांच्या भल्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोणाकडेही जाण्याची त्यांची तयारी असायची. त्यामुळेच कामगारांच्या प्रश्नावर ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यानंतर उद्घव ठाकरे यांना भेटायला जाण्यात समाजवादी पिंडाच्या या माणसाने कधी किंतु बाळगला नाही. त्यांनी त्या कामगारांना प्रत्येक मागणी भांडून मिळवायला शिकवलं. टॅक्सी, रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याचा फॉर्म्युला कायमस्वरूपी ठरवण्याची मागणी त्यांनी सरकारकडून मान्य करून घेतली.
एके काळी हॉटेल कामगार, थिएटर कामगार बॉम्बे लेबर युनियनचे सदस्य होते. त्यातील अनेक शिकलेल्यांना युनियनचे पूर्णवेळ सेवक म्हणून कामगार चळवळीत संधी दिली.
 जॉर्जने आपल्याच कर्नाटकातल्या माणसाला इथे नेता म्हणून आणलं, अशी टीका एके काळी व्हायची. पण शरद राव यांचा जन्म नायर रुग्णालयात झालेला आणि शिक्षणही गिरगावातलं. त्यामुळे मी अस्सल मराठी आहे, असं ते खणखणीत आवाजात सांगायचे. एकाहत्तरीनिमित्त त्यांचा षण्मुखानंद सभागृहात मोठा सत्कार झाला. त्यावेळी त्यांच्यावर तयार करण्यात आलेली फिल्म दाखवण्यात आली. ती पाहताना, त्यांचेही डोळे ओलावले होते. हा समाजवादी नेता खासगी जीवनात मात्र धार्मिक होता. दरवर्षी त्यांच्या गोरेगावातील घरी गणपती यायचा, सत्यनारायणाची पूजा व्हायची. त्यावेळी ते सर्वांना हमखास बोलवायचे. एरवी त्यांना घरी भेटण्यासाठी सकाळी आठच्या आतच पोहोचावे लागे. ते आठ ते सव्वाआठच्या सुमारास घरातून कामगारांचे प्रश्न सोडवायला बाहेर पडायचे. रात्री ११ च्या आधी ते घरी पोहोचले, असे क्वचितच झाले असेल. काम हेच त्यांचे व्यसन होते. अक्षरश: वादळाप्रमाणे ते ४० वर्षं मुंबईच्या जनजीवनात आपल्या कामातून घोंघावत राहिले.
दोनच दिवसांपूर्वी २0४ राजा राममोहर रॉय ही इमारत कोसळली. तिथेच बसून जॉजॅ, शरद राव यांनी कामगार संघटना चालवल्या. कायमस्वरूपी वर्दळ असलेल्या इमारतीच्या कोसळण्यानंतर खऱ्या अर्थाने फुलटायमर असलेले शरद राव यांचं जाणं हा त्यांच्या चळवळीला मोठाच धक्का म्हणावा लागेल.

Web Title: The end of a storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.